सातारा : कोरोनाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या लाॅकडाऊनच्या काळामध्ये मास्क वापरणे अनिवार्य असतानाही तसे न करता वडूज शहरातून फिरणार्या महिलेला उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या सांगण्यावरून सवलत दिल्याच्या आरोपावरून वडूज पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांची अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या दालनात आज चौकशी झाली. यावेळी संबंधित महिलेलाही पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचा सांगावा आल्याने याप्रकरणी नेमके कोणाचे नाव समोर येणार याची उत्सुकता खटाव तालुक्यातील लोकांना लागून राहीली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मार्च महिन्यापासूनच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात संचारबंदीचे नियम न पाळणारे तसेच मास्क न घालणाऱ्या लोकांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार वडूज शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्यावर कारवाईचा सपाटा सुरू होता.
अशातच दि. 6 मे रोजी एक महिलेला तिच्या दुचाकीवरून विनामास्क जाताना पोलिसांनी नाकाबंदीच्या ठिकाणी थांबवले होते. त्यानंतर दंडात्मक कारवाईचा बेत पोलिसांनी आखल्यानंतर त्या महिलेने उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी यांना फोन केल्यानंतर महामुनी यांनी वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी काळे यांना दूरध्वनी करून सदर प्रकरणी हस्तक्षेप करण्याचे आदेश दिल्याचे बोलले जात होते.
त्यानंतर बरेच वरखाली फोन झाल्यावर सदर महिलेला सोडून देण्यात आल्याची चर्चा खटाव तालुक्यात चांगलीच रंगली होती. त्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्याने याबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ सुहास वारके यांना पत्र लिहून घटनाक्रम कळवला होता. त्याची गंभीर दखल घेत, डाॅ. वारके यांनी सातार्याचे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना चौकशीचे आदेश दिल्यानंतर रविवारी सायंकाळी याबाबतचा मेल वडूज पोलीस ठाण्यात धडकला अन् सगळ्यांचीच पळापळ सुरू झाली.
अनेकांचे व्हाॅट्सअप काॅल सुरू झाले तर मिळालेल्या नोटीसही व्हाॅटस्अपच्या माध्यमातून एकमेकांना पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी संबंधित पोलीस दादा व ती महिला चौकशीकामी पोलीस मुख्यालयाच्या आवारात दिसून आली तर उपविभागीय पोलीस अधिकारी सकाळीच वरिष्ठांना भेटून गेल्याचे सुत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. साधारणपणे बारा वाजल्यानंतर सुरू झालेल्या चौकशीत नेमके काय घडले याचा तपशील मिळाला नसला तरी वातावरण गरम झाल्याचे सुत्रांनी सांगितले