नाणे मावळ – नाणे मावळात टाटा कंपनीच्या धरणांशिवाय शासनाचा वडीवळे प्रकल्प हे महत्त्वाचे धरण आहे. हे धरण 70.72 टक्के भरले आहे. सध्या धरणाचे दरवाजे उघडे असून ते येत्या 1 ऑगस्टला बंद करण्यात येणार आहे.
अतिवृष्टीचा तालुका म्हणून मावळ तालुक्याला ओळखले जाते. वडीवळे हे महत्त्वाचे धरण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली तरी कधीही या धरणातील पाणीसाठा कमी पडत नाही. धरणाच्या सक्षमतेच्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होण्यास धरण सज्ज आहे. या धरणाच्या पाणीसाठ्यावर सुमारे शंभर गावांची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. उया पाणीसाठ्यामुळे पुढील वर्षभर पाण्याची टंचाई निर्माण होणार नसल्याची माहिती वडीवळे प्रकल्पाचे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.
वडीवळे धरणातून नाणे मावळातील उकसान, गोवित्री, करंजगाव, नाणे, कामशेतसह इतर गावे, वाड्या-वस्त्यांसह वडगाव-तळेगाव ते देहू-आळंदीपर्यंत पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नाणे मावळसह अनेक गावांच्या दृष्टीने हे धरण महत्त्वाचे आहे. 11 जुलै रोजी सुमारे 4847 क्यूसेकने धरणातून पाणी सोडण्यात आले होते.