नवी दिल्ली, दि. 3- करोनावर केवळ लसीकरणाच्या माध्यमातूनच अंकुश प्रस्थापित केला जाऊ शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याकरता लसीकरण मोहिमेला गती दिली जाण्याची निकडही वारंवार व्यक्त केली जाते आहे. भारतातला सगळ्यांत सक्रिय असलेल्या 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाची दारेही खुली करण्यात आली आहेत. मात्र हे सगळे होत असताना देशात आज सगळ्यांच राज्यांत लसींचा तुटवडा असल्याचे चित्र आहे.
त्यावर तोडगा काढण्यासाठी परदेशी लसींचीही देशात आयात करण्यात येत आहे. असे असले तरीही देशाच्या लोकसंख्येच्या दृष्टीने हा पुरवठाही पूरेसा नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. याचदरम्यान, कोव्हिशिल्ड लस निर्मिती करण्याऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अदर पूनावाला यांनी लसींचा तुटवडा अशाच पद्धतीने येत्या 2- 3 महिन्यांपर्यंत जाणवत राहिल, असे सूचक वक्तव्य केले आहे.
सध्याच्या घडीला एका दिवसाला 6- 7 कोटी लसींच्या निर्मितीचा आकडा जुलै महिन्यातच 10 कोटींवर पोहोचू शकेल, अशी वस्तूस्थितीही त्यांनी मांडली. मागणी कमी असल्यामुळे याआधी कंपनीने लसींचे उत्पादन वाढवले नसल्यामुळेच जुलै महिन्यापर्यंत लसींचा तुटवडा हमखास जाणवण्याची चिन्हे आहेत.
लसीला पुढे मागणी नव्हती. आम्ही देखील विचार केला नव्हता की एका वर्षाला एवढ्या मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती करावी लागेल. पुनावालांनी हे वक्तव्य लंडनमधील फायनान्सियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत केले.
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर संबंधित यंत्रणेला जानेवारी महिन्यापासून अपेक्षितच नव्हता. सर्वांना खरच वाटत होते की करोनाच्या संकटाला आपण थोपवू लागलो असल्याचेही ते या मुलाखतीत म्हणाले. सीरमला 3 हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम मागील महिन्यात सरकारने दिली होती. ही तरतूद 18 वर्षांवरील नागरिकांसाठीच्या लसींच्या उत्पादनासाठी होती, अशी महत्त्वाची माहिती पूनावाला यांनी दिली.