नवी दिल्ली- करोनामुळे संपूर्ण देश प्रभावित झाला आहे. दर दिवसाला रूग्णांचा आकडा वाढतो आहे रूग्णांच्या संख्यने आतापर्यंत 54 लाखांचा आकडा ओलांडला आहे. अशात आता सगळ्यांच्या नजरा येणाऱ्या लशीवर स्थिरावल्या आहेत. अनेक देश लस बाजारात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतातही लशी चाचणीच्या विविध टप्प्यांत आहे.
सर्वसाधारणपणे या वर्षाच्या अखेरीस लस उपलब्ध होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र लस आली की सगळे झाले असे होणार नसून खरे आव्हान पुढेच असेल. त्यामुळेच अधिक सावध राहत संपूर्ण सज्जता ठेवण्याचा सल्ला जाणकारांकडून दिला जातो आहे.
पुढच्या वर्षांच्या अर्थात 2021 च्या पहिल्या तिमाहीत भारतात लस उपलब्ध होण्याचा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला आहे. मात्र लस आल्यावर तिचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि देशाच्या सर्व भागात तिचे सुरक्षित वितरण करण्याचेच मोठे आव्हान सरकारसमोर राहणार आहे.
भारतासारख्या देशांमध्ये लशीपेक्षा इतर पुरक बाबीच अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत. जाणकारांच्या मते लशीची कुपी निर्मित्ती झाल्यानंतर दुर्गम भागात अर्थात इशान्येकडचा भाग किंवा लडास भागापर्यंत पोहोचवणे मोठे जिकरीचे असणार आहे. त्याचे कारण लस अत्यंत कमी तापमानात स्टोअर करून ठेवावी लागते. अन्यथा ती खराब होण्याचा धोका असतो.
सुरक्षित लस देण्यासाठी लाखोंच्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. कोट्यवधी लोकांना लस द्यायची आहे. त्याकरता तेवढा कर्मचारी वर्ग असणे आणि तोही प्रशिक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे.
लस घेण्यासाठी जाण्याकरता लोकांना फार प्रवास करावा लागणार नाही, लशीकरण केंद्रावर फार गर्दी होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे.
फ्रंटलाईनमध्ये अर्थात आघाडीवर काम करणारे कामगार आणि 65 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना अगोदर लस देण्यास सरकारचे प्राधान्य असेल असे सूत्रांचे म्हणणे आहे. आपली लोकसंख्या पाहता लस देण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही महिने कदाचित काही वर्षांचाही कालावधी लागू शकतो.
सीरमने अगोदरच 2024 पर्यंत वेळ याला लागू शकतो असे म्हटले आहे. तोपर्यंत पुरेशा लसीच उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे या संस्थेकडून अगोदरच सूतोवाच करण्यात आले आहे.