2020 या वर्षातील 9 महिने संपूर्णपणे ग्रासून टाकणाऱ्या करोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. देशातील सर्व व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच आता लसीकरणाचे कवच मिळू लागल्याने लोकांना मोठ्याप्रमाणावर दिलासा मिळणार आहे; पण भारतासारख्या मोठ्या देशामध्ये 130 कोटी लोकांपर्यंत ही लस पोचवण्यासाठी प्रचंड प्रमाणात प्रयत्न करावे लागणार असून केवळ नियोजनबद्ध पद्धतीने ही लसीकरणाची मोहीम यशस्वी होऊ शकते.
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करत असताना स्वतंत्रपणे जे आवाहन केले आहे, तेसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे मानावे लागणार आहे. कारण लसीकरण उपलब्ध झाले याचा अर्थ करोना महामारीचा धोका संपला असा होत नाही, ही गोष्ट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या साधारण नऊ ते दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये भारतासारख्या मोठ्या देशांमध्ये या महामारीच्या रुग्णांचा आकडा लोकसंख्येच्या मानाने फारसा वाढला नाही. कारण सर्वच भारतीयांनी या काळामध्ये काळजी घेण्यात कोणतीच कसूर ठेवली नव्हती. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन या त्रिसूत्रीचा योग्यपणे वापर केल्याने भारतातील रुग्णांचा आकडा मर्यादित राहिला. आता ही लस उपलब्ध झाली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे, मास्कचा वापर करण्यास विसर पडू देता कामा नये. आणखी काही महिने तरी सर्व प्रकारच्या प्रतिबंधक उपायांची योजना प्रत्येकालाच प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने करावी लागणार आहे. देशातील लसीकरणाची मोहीम सर्वार्थाने यशस्वी व्हावयाची असेल, तर सर्वच थरातील लोकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे, या कालावधीमध्ये लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवता कामा नये. अशा प्रकारच्या कोणत्याही मोहिमेनंतर समाज माध्यमांवर अफवांचे पीक येते. कुणीतरी लस टोचून घेतल्यावर त्याला त्रास झाला असून ही लस घेतल्यावर कोणाचा मृत्यू झाला, अशा प्रकारच्या बिनबुडाच्या अफवा पसरवल्या जाण्याचा धोका आहे. चांगल्या चाललेल्या मोहिमेमध्ये खो घालण्यासाठी समाजकंटक नेहमीच कार्यरत होत असतात. या मोहिमेबाबतही तसे होण्याचा धोका असल्यानेच सर्वांनीच जागरूक राहण्याची गरज आहे. सर्व प्रकारच्या अत्युच्च तपासण्या करूनच भारतात लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली असल्याने कोणालाही त्यापासून धोका नाही, हे गृहीत धरूनच लसीकरणाला पाठिंबा द्यायला हवा. भारतात तयार झालेल्या या लसीच्या सुरक्षिततेबाबत देशातील वैज्ञानिकांना संपूर्णपणे खात्री पटल्याने ही लस वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान लक्षात ठेवण्याची गरज आहे. म्हणजेच प्रतिबंधक उपायांची योजना करतानाच आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचा निर्धार करतानाच या लसीकरणाच्या वितरणाबाबत सरकारी पातळीवर योग्य नियोजन होण्याची गरज आहे.
लसीकरण मोहिमेच्या सध्याच्या नियोजनाप्रमाणे आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि नंतर 50 वर्षांवरील नागरिक अशाप्रकारे लसीकरणाची मोहीम चालू ठेवण्यात येणार आहे. हा प्राधान्यक्रम अत्यंत योग्य असला तरी देशातील इतर नागरिकांच्याही भावना लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकापर्यंत ही लस पोहोचेल यासाठीही सरकारने अत्युच्च पातळीवर कार्यक्षम असे नियोजन करण्याची गरज आहे. लसीकरणाच्या मोहिमेसाठी सरकारने जे ऍप लॉन्च केले आहे ते अनेक ठिकाणी व्यवस्थितपणे कार्यरत नसल्याचेही पहिल्या दिवशी समोर आले होते. जर ऍपच्या माध्यमातून सरकारला लसीकरणाची मोहीम राबवायची असेल तर हे ऍप संपूर्णपणे कार्यक्षम पद्धतीने कार्यरत राहणे आवश्यक आहे. देशातील नागरिकांना देशातच तयार झालेल्या कोवॅक्सीन आणि कोविशील्ड या दोन लसी टोचण्यात येणार आहेत. या लसींची निर्मिती करणाऱ्या संस्थांची उत्पादन क्षमता लक्षात घेऊन सरकारला नजीकच्या कालावधीमध्ये लसीकरणाची संपूर्ण मोहीम हाताळावी लागणार आहे. त्यातच काही ठिकाणी डॉक्टरांनीच कोवॅक्सीन लसीला विरोध केला असून त्याऐवजी कोविशील्ड या लसीची मागणी केली आहे. या बाबतचा संभ्रमही सरकारने आता दूर करायला हवा.
भारत बायोटेकने निर्माण केलेली कोवॅक्सीन असो किंवा सीरम इन्स्टिट्यूटने निर्माण केलेली कोविशील्ड असो दोन्ही लसी सारख्याच प्रमाणात कार्यक्षम आणि प्रभावी आहेत, हे सरकारने समजावून सांगायला हवे. या दोन्ही संस्थांच्या लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा झाला तरच भारतासारख्या मोठ्या देशामध्ये सर्वांपर्यंत लस पोहोचणे शक्य होणार आहे. भारतातील ही लसीकरणाची मोहीम जगातील सर्वात मोठी मोहीम मानली जाणार असल्याने जागतिक आरोग्य संघटनेचे ह्या मोहिमेकडे लक्ष आहे. साहजिकच कोणत्याही परिस्थितीत सर्वच पातळीवर ही मोहीम यशस्वी होण्यासाठी या लसीकरणाशी संबंधित सर्वच घटकांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. तेवढीच जबाबदारी सामान्य नागरिकांचीही आहे. कोणत्याही अफवा, चुकीच्या बातम्या आणि चुकीची माहिती याच्यावर विश्वास ठेवून, काळ्याबाजारात लसीची खरेदी करणे किंवा घाईघाईने बनावट लसीची खरेदी करणे असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. सरकारच्या आरोग्य यंत्रणेला आणि सामान्य प्रशासन विभागाला आगामी कालावधीमध्ये या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागतील. देशातील प्रत्येक नागरिकाला टप्प्याटप्प्याने लस टोचली जाईल, याची खात्री यानिमित्ताने केंद्र सरकारने द्यायला हवी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली जबाबदारी ओळखून लोकांना ज्या प्रकारे जागृत केले आहे त्याच प्रकारे सर्व सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी नजीकच्या कालावधीमध्ये आपापल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना जागृत करण्याची गरज आहे. या महामारी विरुद्धच्या युद्धात करोनाला पराभूत करण्यासाठी जे शस्त्र वापरले जात आहे, ते प्रभावी ठरण्यासाठी समाजातील सर्वच घटकांचा हातभार लागणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत लसीकरणाची ही मोहीम सर्वार्थाने यशस्वी व्हायलाच हवी.