नवी दिल्ली : देशातील करोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. त्यातच आता एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस द्यावेत हे प्रोटोकॉलला धरुन नसून सध्या तरी ते अशक्य आहे असे निती आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारतात जे लसीकरण सुरु आहे ते नियमांनुसार आणि दोन डोसचे वेळापत्रक पाळूनच होईल असेही निती आयोगाने सांगितले आहे.
निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल यांनी ही माहिती दिली. लस तुटवडा असताना, अनेक नागरिकांना दुसऱ्या डोससाठी वाट पहावी लागत असताना अशा प्रकारे दोन वेगवेगळे डोस देण्याची शक्यता पुढे आली होती. पण सध्या तरी हे शक्य नाही असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
निती आयोगाचे (आरोग्य) सचिव डॉ.व्ही. के. पॉल यांनी सांगितले, भारतात सुरु असलेल्या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये कोणताही बदल होणार नाही. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर हे 12 आठवडे तर कोवॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर हे चार ते सहा आठवडेच राहणार आहे.
डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, “एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळे डोस दिल्यास त्यामुळे संबंधित व्यक्तीला रिअॅक्शन येण्याची शक्यता आहे. काही प्रकरणात असं लक्षात आलंय की दोन वेगवेगळे डोस घेतल्यानं संबंधितामध्ये रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पण सध्यातरी अशा प्रकारे एकाच व्यक्तीला दोन वेगळ्या लसींचे डोस देण्यात येणार नाही.” असेही पॉल यांनी यावेळी म्हटले.