राजगुरूनगरमध्ये प्रशासन हतबल ः संचारबंदीतही वाढतेय रस्त्यावर गर्दी
राजगुरूनगर -करोना विषाणूंची भीती बाजूला ठेवून राजगुरूनगर शहरात सर्रासपणे नागरिक फिरत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. नागरिक स्वतःच काळजी घेत नसल्याने मोठी आपत्ती ओढण्याची भीती व्यक्त होत आहे.
सर्व सामान्य नागरिकांना सर्व आवश्यक सोयी सुविधा प्रशासन व स्वयंसेवी संस्था उपलब्ध करून देत असताना नागरिक मात्र मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहे. त्यांना अटकाव करण्यात प्रसकीय यंत्रणा अपयशी ठरली आहे. किराणा व भाजीपाल्याची नागरिक साठवण करू लागले आहेत. भाजीपाल्याचे भाव दुपटीने वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना आता भाजीपाला खरेदी करणे अवघड झाले आहे. याबरोबरच काही किराणा दुकानात जीवनावश्यक वस्तूंच्या भाव वाढले आहेत.
राजगुरूनगर शहरात प्रशासनाच्या वतीने करोना विषाणू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना अवलंबली होती; मात्र तर जनताच साथ देत नसल्याचे चित्र आहे. दिवसाआड नागरिक भाजी, किराणा, आदी वस्तू खरेदीसाठी रस्त्यावर आले आहेत. आज सकाळपासून शहरातील वाडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भाजी बाजार भरला. शहरातील नागरिकही खरेदीसाठी रस्त्यावर उतरला.
यात अनेकजणांनी मास्क, रुमाल बांधले नव्हते. त्यांच्यात सुरक्षित अंतरही नव्हते. अख्खा देश करोना संकटात असताना राजगुरूनगरकर मात्र लॉकडाऊनचे उल्लंघन करीत आहेत. होम क्वारंटाइन करण्यासाठी नागरिक पुढाकार घेत नसल्याने प्रशासनालाच आता प्रखर भूमिका घ्यावी लागणार आहे.
शेतकरीवर्ग अडचणीत
एकीकडे करोना विषाणूंचे संकट आले आहे तर दुसरीकडे अवकाळी पाऊस सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिक हतबल झाला आहे. लॉकडाऊन असताना पाऊस कोसळत असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. काल (दि. 26) तुरळक पाऊस झाला आज त्यात वाढ होऊन चांगलाच बरसला.
यामुळे शेतातील नगदी भाजीपाला पिकाला फटका बसला आहे. छोटे मोठे शेतकरी, वीटभट्टीधारक अडचणीत आले आहेत. पावसामुळे हवेत थंडावा पसरत असल्याने करोना विषाणूला पोषक वातावरण निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.