चाफळ (वार्ताहर) – कळंत्रेवाडी, ता. कराड येथील उत्तरमांड काठालगत बांधलेल्या नदीघाटाची दुरवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने शासनस्तरावर पाठपुरावा करून निधी उपलब्ध करावा आणि येथील नदीघाटाची डागडुजी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
साधारणपणे दहा वर्षांपूर्वी हा घाट तळापर्यंत बांधण्यात आला होता. कालांतराने दरवर्षी येणाऱ्या पुराच्या गतिमान प्रवाहामुळे नदी तळातील खडकाची मोठ्या प्रमाणावर झिज झाल्याने नदी घाट आणि नदीचे पात्र यामधील अंतर वाढत गेले आणि घाटाची दुरवस्था झाली.
गावातील बहुतांश महिला याठिकाणी कपडे धुण्यासाठी येत असतात. तसेच दरवर्षी गणपती विसर्जन पण याच ठिकाणी होते.आणि दशक्रीया विधीसारखे धार्मिक विधीही याच ठिकाणी होत असतात. भविष्यात गावातील एखादी महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले पाण्याचा अंदाज न आल्यास पाय घसरून नदीपात्रात पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकंदरित अशी सर्व परिस्थिती असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने शासनस्तरावर पाठपुरावा करावा. दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करत येथील घाटाचे नदीपात्रातील शेवटच्या टप्प्याचे बांधकाम पूर्णत्वास नेऊन येथील ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.