आधी एक-दोन वेळा उल्लेख केल्याप्रमाणं एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे बहात्तर अशी 6-7 वर्षं आम्ही दिघी मुक्कामी होतो. या मुक्कामात राजकीय क्षेत्रातली अनेक दिग्गज नेतेमंडळी ज्याप्रमाणं खूप जवळून बघायला मिळाली. त्याचप्रमाणं “मंडी हाऊस’ या राजधानी दिल्लीतल्या परिसरात असणाऱ्या निरनिराळ्या सांस्कृतिक संस्थांमध्ये अनेक प्रकारचे मान्यवर कलावंतसुद्धा बघायला मिळाले. त्यांच्याबरोबर संपर्क साधता आला. याच भागात संगीत-नाटक अकादमी, विविध राज्यांची भवनं-निवासस्थानं, दूरदर्शनचं महासंचालनालय आणि मुख्य म्हणजे याच भागात “नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची वास्तू बघायला मिळाली. “नाट्य-गुरू’ असा ज्यांचा खूप आदरपूर्वक उल्लेख केला जातो ते इब्राहिम अल्काजी यांनी हे स्कूल मुळात सुरू केलं. त्या नाट्यगुरू अल्काजींचे महाराष्ट्रावर खूप उपकार आहेत. त्यांनी नाट्यविषयक जे शिक्षण-प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं त्या तालमीतून तयार झालेले सर्वश्री प्रा. कमलाकर सोनटक्के, प्रा. यशवंत केळकर, प्रा. जयदेव हट्टंगडी, अरुण जोगळेकर, प्रा. वामन केंद्रे, चिन्मय मांडलेकर या पुरुष कलाकारांच्या बरोबरच सई परांजपे, रोहिणी हट्टंगडी, सुहास जोशी, ज्योती सुभाष इत्यादी मान्यवर स्त्री-रंगकर्मी यांची परंपरा आता खूप मोठी आहे. त्यात प्रकर्षाने नाव घ्यायलाच हवं ते उत्तरा बावकर या कलावतीचं. खरोखरीच फार गुणी कलाकार. अतिशय मितभाषी.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक इब्राहिम अल्काजी या नाट्यगुरूचं केवळ दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना वंदन करून त्यांचं “स्कूल’ बघण्यासाठी मी मुद्दाम गेलो होतो. तीन वर्षांचा त्यांचा कोर्स करण्याचाही माझा मानस होता. पण “आकाशवाणी’ची नोकरी सांभाळून तो करता येणार नाही हे माझ्या लगोलग लक्षात आलं होतं. पण त्यावेळी अल्काजींच्या कचेरीत मला दोन व्यक्ती दिसल्या होत्या- भेटल्या होत्या. त्यातली एक व्यक्ती म्हणजे- पुढं महाराष्ट्रातले एक मान्यवर “नाट्यगुरू’- प्रा. कमलाकर सोनटक्के आणि दुसरी व्यक्ती म्हणजे मोठ मोठ्या डोळ्यांची- काळीसावळी- शिडशिडीत बांध्याची पण अतिशय “स्मार्ट’ आणि “अलर्ट’ असणारी, साडी परिधान केलेली आणि पुढं मराठी-हिंदी-इंग्रजी या तिन्ही भाषातंली चित्रपट- मालिका या माध्यमांवर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी, किमयागार जादूगार कलावती उत्तरा बावकर.
कोणत्याही गुरूनं आपल्या शिष्यांची सदैव काळजी घ्यायला हवी, नव्हे, त्यानं किमान तसा प्रयत्न तरी करायला हवा; या तत्त्वानुसार इब्राहिम अल्काजी यांनी “नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या संस्थेतून उत्तीर्ण होऊन नाट्य चळवळीशी बांधून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक योजना तयार केलेली होती. “रेपेट्री’ असं या योजनेचं नाव होतं.
नाट्यविषयक शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन या संस्थेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकसारखी वाढत होती. पण त्यामानानं सरकारी आणि खासगी क्षेत्रात सुद्धा या शिक्षण-प्रशिक्षणाला त्या काळात तितकंसं महत्त्व दिलं जात नव्हतं. या संस्थेत अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्या-रचना, रंगभूषा- केशभूषा- वेशभूषा असं विविध प्रकारचं शिक्षण दिलं जायचं. तरीही चटकन नोकरी वा व्यवसाय प्रवेश या गोष्टी घडत नव्हत्या. म्हणून अल्काजींनी पुढाकार घेऊन एन.एस.डी. मधून उत्तीर्ण होणाऱ्या मुला-मुलींना काहीसा आर्थिक हातभार मिळावा म्हणून ही “रेपेट्री’ सुरू केली होती. “रेपेट्री’ म्हणजे एक प्रकारची नाटक कंपनीच होती. या कंपनीतर्फे हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषांमध्ये काही नाटकांचे प्रयोग केले जात. ते तिकीट लावून व्हायचे. गावोगावी ते केले जायचे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातले काही पैसे या नाटकातून भूमिका करणाऱ्या कलावंतांना दिले जायचे. हळूहळू एन.एस.डी.चं नाव होत गेलं. आता तर मराठी रंगभूमीवर वावरणाऱ्या एकूण कलावंतांपैकी “नाट्यशाळे’तून आलेल्या कलावंतांची संख्या बरीच आहे. त्यापैकी उत्तरा बावकर ही एक गुणी आणि देखणी अभिनेत्री होती, आहे. परंतु त्या काळात प्रा. कमलाकर सोनटक्के, उत्तरा बावकर, चमन बग्गा, ओम शिवपुरी- पती पत्नी, असे कितीतरी मान्यवर कलाकार या “रेपेट्री’मधून या ना त्या प्रकारचं काम करताना दिसत.
“अंधायुग’ सारखं नाटके एक प्रयोग म्हणून दरवर्षी केलं जाई. “मॅकबेथ’, “हॅम्लेट’, “ऍथोल्लो’, अशी किती तरी गाजलेली नाटकं त्या काळात अभ्यासाचा विषय म्हणून केली जायची. नाट्यमंडळी दिल्लीतच वास्तव्याला असत. ती बहुतेक सारी हे नाट्यप्रयोग बघण्यासाठी मुद्दाम यायची. एकेक नाटक तीन-चार दिवस तरी तीन-चार प्रयोग करी. हिंदी, हिंदुस्थानी, उर्दू अशा भाषांमध्ये ही नाटकं सादर केली जात. अशा या देखण्या प्रयोगात प्रकर्षानं उपस्थिती असायची ती उत्तरा बावकर या नटीची-अभिनेत्रीची तिला दिग्दर्शन-रंगमंच व्यवस्थापन- नेपथ्य- प्रकाशयोजना-ध्वनीसंकेत या सर्व शाखांचं आवश्यक ते ज्ञान होतं, ते असायचं. पण उत्तरा लक्षात राहायची त्या त्या नाटकातल्या तिच्या सर्वांगसुंदर अभिनयानं. अर्थात मुंबई किंवा कलकत्ता, हैद्राबाद- बेंगलोर, चेन्नई जशी नाटकाची केंद्र मानली जातात तसं दिल्लीचं नाही.
दिल्ली म्हणजे केवळ राजकीय रंगमंच. त्यामुळं सई परांजपे काय की मराठवाड्यातून दिल्लीला पोहोचलेले कमलाकर सोनटक्के काय की अगदी वामन केंद्रे काय की प्रसाद वनारसे काय या साऱ्या गुणी कलावंतांचं मन राजधानी दिल्लीत रमणं शक्यच नव्हतं तसं ते रमलं नाही. “बंगाली मार्केट’ सारख्या राजधानी दिल्लीतल्या अगदी मध्यवस्तीत राहणारं शिवपुरी कुटुंबसुद्धा शेवटी कलेच्या ओढीनं मुंबई गाठतानाच पाहायला मिळालं. आणि मग शिवपुरींनी खलनायकी भूमिका करून हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. मग उत्तरा बावकर सारखी कलावती ही तरी या साऱ्याला कशी अपवाद ठरणार. मुळात दिल्लीत वास्तव्याला असणाऱ्या या कलावतीचे पाय अलगदपणे मुंबईच्या दिशेनं वळले नसते तरच नवल! ती दिल्ली आणि मुंबई अशा दोन्ही शहरात नाटक-चित्रपट करताना दिसली. अर्थात म्हणून तिनं सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांनी दिल्लीत जशी मराठी-हिंदी नाटकं केली तशी या दिल्लीकरीण उत्तरानं कधी “दिल्ली दरवाजा’, “मराठा मित्र मंडळ’ अशा संस्थांच्या गणपती उत्सवामधल्या नाटकात भूमिका केल्या नाहीत.
आमच्यासारखी मंडळी अशा नाटकांमधून भूमिका करीत. पण उत्तरा बावकर ही अभिनेत्री कधी “करोलबाग’ या दिल्लीतल्या एका उपनगराच्या नाटकात भूमिका करताना कधी दिसली नाही. परंतु तिला मुंबई आणि दिल्लीच्या रंगमंच आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांच्या व्यावसायिक भागांची ओढ होती. आणि त्या दृष्टीनं फारसा गाजावाजा न करता तिचे तसे प्रयत्न सुरू आहेत हेही जाणवायचं.
चित्रवाणी मालिकांमध्ये भूमिका करणारे असंख्य अभिनेते आणि अभिनेत्रीसुद्धा रोज आपल्या भेटीला येत असतात. परंतु, हे सारं कुठवर, तर त्यांची मालिका रोज दाखवली जाते आहे तोवर. पण एकदा का या मालिकांचं प्रक्षेपण थांबवलं गेलं किंवा बंद पडलं की, ते अभिनेते आणि अभिनेत्री रोजच्या रोज रतीब घातल्यासारखे आपल्या घरच्या टीव्हीवर येताना दिसत नाहीत. उत्तरा बावकर आज टी.व्ही.च्या पडद्यावर फारशा दिसत नाहीत. पण एकेकाळी या अभिनेत्रीनं, “यात्रा’, “तमस’, “एक दिन अचानक’, “दोघी’, “सरदारी बेगम’, “तक्षक’, असे उत्तोत्तम चित्रपट तर केलेच, पण त्याचबरोबर “जिंदगी जिंदाबाद’, “कोरा कागज’, “नजराना’, “उत्तरायण’, “वास्तूपुरुष’, अशाही हिंदी-मराठी चित्रपटांत अभिनय करून त्यांनी चित्रपट क्षेत्रात आपलं स्थान पक्कं केलं. “रिश्ते’, “जब लव्ह हुआ’, “उडान’, “कश्म कश्म जिंदगी’, “जस्सी जैसी कोई नही’, “अंतराळ’, अशा अनेक चित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी आपल्या मिळालेल्या भूमिका गाजवल्या. सदाशिव अमरापूरकर, रेणुका शहाणे, सुमित्रा भावे, अर्थात दिग्दर्शिका सोनाली कुलकर्णी इत्यादी या क्षेत्रातल्या मान्यवरांच्याबरोबर तोडीस तोड अभिनय करून त्यांनी आपले चित्रमालिका तसंच चित्रपट कारकीर्दही गाजवली. त्याचं मुख्य कारण म्हणजे उत्तरा बावकर ही एक सामर्थ्यवान आणि प्रशिक्षित अभिनेत्री आहे. उत्तरा बावकर यांनी “तुघलक’, “संध्या छाया’, “छोटे सैय्यद, बडे सैय्यद’, “उमरावजान’, अशा अनेक नाटकांतून त्याच प्रमाणं चित्रपट आणि चित्रमालिकांमध्ये आपल्या अभिनयाची विलक्षण आणि वेगळी छाप पाडणाऱ्या कलाकृतींमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत.
अनेक वर्षं दिल्लीतच वास्तव्य असणाऱ्या या कलावतीनं पुष्कळ उशिरा मुंबई या महत्त्वाच्या सांस्कृतिक केंद्रात प्रवेश केला पण याही नगरीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा नक्कीच उमटवलेला आहे. एकोणीसशे अडुसष्ट साली त्यांनी आपल्या नाट्य शिक्षणाची सांगता केली आणि एन.एस.डी. नाट्यशाळेतून त्या बाहेर पडल्या. 1968 ते 1984 अशी 15-16 वर्षं विविध माध्यमांमध्ये आपली कला सादर करता करता 1984 साली त्यांना “संगीत नाटक अकादमी’ या देशातल्या केंद्र सरकारच्या अखत्यारित असणाऱ्या “संस्थेची फेलो’ हा मान, तर मिळालाच पण त्याचबरोबर त्यांना सहाय्यक अभिनेत्रीचं फिल्म फेअर पारितोषिकही 1988 साली प्राप्त झालं.
मला उत्तरा यांच्याबद्दल नेहमी असं वाटत आलं आहे की, त्यांनी राजधानी दिल्ली सोडून मुंबईसारख्या त्यांच्या दृष्टीनं मोक्याच्या असणाऱ्या शहरात उशिरानंच “एंट्री’ केली. पण म्हणतात ना, “समय से पहले और भाग्य से ज्यादा किसी को कुछ नही मिलता’ तेच शेवटी खरं असेल. उत्तरा बावकरांना तशीच बुद्धी झाली असणार! या सदरातल्या महिला रंगकर्मी या झटपट प्रसिद्ध झालेल्या किंवा “ओव्हरनाइट हिरॉईन’ झालेल्या अभिनेत्री नाहीत. उत्तरा बावकर हिच्या कलेत आणि वागण्यात काही दोष आढळतीलही पण परफेक्शनिस्ट म्हणवणाऱ्या चित्रपट ः निर्माती-दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांची उत्तरा बावकर ही मैत्रिण आहे. यात काय ते सारं आलं.
साठवण
डॉ. विश्वास मेहेंदळे