सुलतानपूर – उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. अशातच आज राज्यातील सुलतानपूर जिल्ह्यात एका १८ वर्षीय युवतीला जिवंत जाळल्याचा अमानवी प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कुटुंबातील वैमनस्य या घटनेला कारणीभूत ठरलं आहे. मूळची तदारसा गावची रहिवाशी असलेल्या १८ वर्षीय श्रद्धाला तीन पुरुषांनी गाठले. यानंतर तिचे हात-पाय बांधत तिच्यावर केरोसीन ओतून जिवंत जाळले.
सदर प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी युवतीला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र आगीत होरपळून निघालेल्या श्रद्धाला वाचवण्यात यश आलं नाही, तिने सोमवारी रात्री उशिरा शेवटचा श्वास घेतला.
मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबामध्ये श्रद्धाने तिन्ही नराधमांची नवे घेतली असून पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचं पोलीस अधिकारी विजय यादव यांनी सांगितलं.
दरम्यान, जून महिन्यामध्ये मुलीच्या कुटुंबीयांचे गावातील एका अन्य कुटुंबासोबत वाद झाले होते. यानंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार देखील करण्यात आली होती. त्या प्रकरणात मुलीचे वडील प्रदीप सिंग यांना अटकही झाली होती. मात्र याच प्रकरणाचा राग डोक्यात ठेऊन आरोपींनी हे अमानवी कृत्य केलं आहे.