सहकार प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध
पंतप्रधान मोदींकडून सहकार क्षेत्राला महत्त्व
बारामती – सहकार मंदिरासमान आहे. त्यात पक्षीय राजकारण आणता कामा नये, असे तत्त्वज्ञान सांगणाऱ्यांनी आपल्या राजकारणासाठी सहकार चळवळ वापरली आहे, असे टीकास्त्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शरद पवार नाव न घेता सोडले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती शहरात आयोजित सहकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी हर्षवर्धन पाटील, राहुल कुल, वासुदेव काळे, गणेश भेगडे, चंद्रराव तावरे, रंजन तावरे, अविनाश मोटे, पांडुरंग कचरे, बाळासाहेब गावडे, सतीश फाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
सीतारामन म्हणाल्या की, देशाच्या अर्थव्यवस्थेत सहकाराचे योगदान अनन्यसाधारण आहे. ग्रामीण अर्थकारणाचा चेहरा असलेल्या सहकारापुढील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून सहकाराला पंतप्रधानांनी महत्व दिले आहे. यासाठी सहकारातील स्वतंत्र मंत्रालय सुरु केले आहे.
त्या म्हणाल्या की, सहकारी क्रेडीट गॅरंटी फंडातून एक कोटी रुपयांचे सहाय्य मिळते. नोकरभरतीत देखील पारदर्शकता आणण्याचे काम सुरु आहे. सरकारप्रमाणेच सहकार विभागालाही थेट पोर्टलद्वारे खरेदीची परवानगी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. निवडणूका निर्भय व निष्पक्ष वातावरणात पारदर्शकपणे करण्याची योजना सुरु आहे. संगणकीरणासाठी 2516 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रशिक्षण व पूरक बाबींसाठीही तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. सीतारामन यांनी केंद्राच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
रंजन तावरे, जाचकांकडून प्रकाशझोत
यावेळी पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे यांच्याकडून सहकारातील सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकण्यात आला. प्रास्ताविकात साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी आधारभूत किंमत, आयकर, इथेनॉल, कर्जांचे पुर्नगठण, साखर निर्यात धोरण आदी मुद्यांवर उहापोह केला. लोकसभा मतदारसंघात अकरा साखर कारखाने असून लाखो लोकांच्या जीवनाशी निगडीत हा जिव्हाळ्याचा विषय आहे. यावेळी रंजन तावरे यांनीही विविध विषयांचा त्यांच्या मनोगतात उल्लेख केला.