नवी दिल्ली – आज आपण सगळे सभागृहाच्या या चार भिंतींमधून (राज्यसभेतून) बाहेर पडत असू, पण हा अनुभव देशाच्या भल्यासाठी चारही दिशांना घेऊन जाऊ हा आपला संकल्प असायला हवा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
राज्यसभेतील तब्बल 72 सदस्यांची मुदत संपल्यामुळे त्यांना गुरुवारी निरोप देण्यात आला. यावेळी सभागृहात उपराष्ट्रपती आणि सभापती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाषण झाले. यावेळी मोदी म्हणाले, ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असते. गुजरातीमध्ये म्हणतात आवजो.. पुन्हा या. खरं तर ते “बायबाय’च म्हणत असतात, पण बोलताना आवजो म्हणतात. आम्ही देखील या क्षणी हेच म्हणू की पुन्हा या.
राज्यसभेचे जे खासदार आज निवृत्त झालेत त्यात अर्थमंत्री निर्मला सितारामन, उद्योग मंत्री पियूष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी, कपिल सिब्बल, पी. चिदंबरम, जयराम रमेश, ए. के. अटोनी, आरसीपी सिंग आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
खूप सारा अनुभव या सदस्यांसोबत आहे. कधीकधी ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असते. अनुभवातून जे मिळालेलं असतं त्यातून समस्या सोडवण्यासाठी सोपे उपाय सापडतात. अनुभवामुळे चुका कमीत कमी होत असतात. अनुभवाचं एक महत्त्व असतं. जेव्हा असे अनुभवी साथीदार सभागृहातून जातात, तेव्हा सदनाला फार मोठी कमतरता जाणवते. देशाला जाणवते. येणाऱ्या पिढीसाठी जे निर्णय होणार असतात, त्यात काहीतरी कमतरता राहाते. अनुभवी लोक जातात, तेव्हा जे इथे आहेत, त्यांची जबाबदारी वाढते, असं मोदी म्हणाले.
तुम्ही मोठ्या व्यासपीठावर या अमृत महोत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीला मार्गदर्शन कराल अशी मला आशा आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.