पुणे – नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) केरळमध्ये येत्या 5 जूनमध्ये तर महाराष्ट्रात 10 जूनला दाखल होण्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली. केरळमध्ये सलग तीन ते चार दिवस पाऊस झाल्यावर मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले जाते. यंदा पावसातील खंड, अल निनोचा प्रभाव यामुळे पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. विशेष पिण्याच्या पाण्याची टंचाईही भासू शकते, त्यामुळे संभाव्य परिस्थिती लक्षात घेता पाणी जपून वापरा, असे आवाहनही डॉ. साबळे यांनी केले.
हवामान बदलले, पाऊसही बदलला त्यामुळे आता शेतकऱ्यांनीही बदलले पाहिजे. मान्सूनचा अंदाज घेऊन, त्याचे प्रमाण लक्षात घेऊन कोणती पिके घ्यायची याचा अभ्यास करून पेरण्या केल्या तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे यंदा खरीपात शेतकऱ्यांनी 65 मिलिमीटर पाऊस व पुरेसा ओलावा झाल्याशिवाय पेरणी करू नये. यशिवाय धुळवाफ पेरणी करू नये. काही प्रमाणात पाणी टंचाई भासणार असण्याची शक्यता असल्याने फळबाग उत्पादकांनी ठिबक सिंचनाने पाणी द्यावे.
अल निनोचा प्रभाव वाढेल तसा खंड वाढेल…
मान्सूनच्या उत्तरार्धात अल निनोचा प्रभाव पहायला मिळणार आहे. जून महिन्यात मान्सून दाखल झाला तरी सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल. तर अल निनोचा मान्सूनवर फारसा परिणाम होणार नसला तरी, पावसातील खंडामुळे सरासरीपेक्षा पाऊस कमी होईल. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण साधारण राहील.