खेळाडूंच्या अस्मितेसाठी मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक संघटनांचे आंदोलन सुरूच राहणार
नगर – सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या सक्तीची रजा व बदली रद्द करण्यासाठी नवनवीन कल्पना लढवत आहे. एवढा अपमान होवून सुध्दा खुर्चीला चिकटून बसणारा अधिकारी नगरकरांनी कधी पाहीला नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी व त्यांचे पतीराज हे खोटी माहिती पुरवून ज्या पध्दतीने सामाजिक संघटनांना बरोबर घेवून पत्रकबाजी करत आहेत त्याला खेळाडू घाबरणार नाही. आमचे आंदोलन हे रास्त असून आम्ही कोणा पुढे झुकणार नाही, अशी भूमिका क्रीडा संघटनांनी घेतली आहे
मुख्याध्यापक संघ, क्रीडा शिक्षक संघटना, खेळ संघटना, खेळाडूं यांनी सुरू केलेले आंदोलन हे खेळाडू विरोधी नाही. कोणत्याही शालेय स्पर्धा आम्ही बंद केलेल्या नाहीत. क्रीडा कार्यालयाला पंच उपलब्ध झाले नाही म्हणून त्या स्पर्धा बंद पडल्या आहेत. आम्ही सर्व क्रीडा शिक्षक स्पर्धेसाठी आमचे संघ घेवून जात आहोत. तसेच आमचे सघांची ऑनलाईन प्रवेशिकाही भरली आहे. नवीन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिलेल्या आश्वसनानंतर काही स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेवून सांगितले होते की, मी दुसरीकडे राहत आहे. परंतु सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या अधिकारी अजून सुध्दा पतीराजांना घेवून जिल्हा क्रीडा संकुलातील चेजिंगरूम मध्येच राहत आहेत.
कोणतेही अधिकार नसतांना कार्यालयीन कामकाजामध्ये ढवळाढवळ करीत असल्याची तक्रार कर्मचारी व नवीन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी आयुक्त कार्यालयाकडे केली असल्याची माहिती मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक संघटनांच्या वतीने देण्यात आली. सामाजिक संघटनांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कितीही निशाणा साधण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही सामाजिक संघटनांकडून पालकमंत्री यांच्यावर निशाना साधण्यात आला आहे.
बंद असलेल्या स्पर्धा सुरु होण्यासाठी व खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून पालकमंत्र्यांनी घेतलेली भुमिका अंत्यत रास्त असून सर्व माहिती घेतल्यावर पालकमंत्री आमच्या बरोबर राहीले असल्याचे संघटनांच्या वतीने सांगण्यात आले. शहरातील सामाजिक संघटनां एवढे वर्षे गप्प का होत्या. त्यांनी कधीही खेळाडूंच्या किंवा क्रीडा क्षेत्राच्या बाजूने आवाज उठविला नाही.
एवढया मोठ्या क्रीडासंकुलाच्या प्रश्नाबाबत कधी आवाज उठवला नाही, त्यांनीही फक्त जिल्हा क्रीडा अधिकारी यांची एकतर्फी बाजू ऐकण्यापेक्षा संघटनांची बाजू ऐकूनच पत्रकबाजी करावयास हवी होती. जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे बद्दल फक्त संघटनाच नव्हे तर खेळाडू, पालक, मंदिर बचाव कृती समिती, लोकप्रतिनिधी, महानगरपालिका व जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांच्या तक्रारी आहेत. या तक्रारींच्या चौकशी बाबत क्रीडा उपसंचालक पुणे यांनी दोन वेळा जिल्हा क्रीडा अधिकारी व संघटना व कार्यालयीन कर्मचारी यांच्या बैठका घेतल्या आहेत.