मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजभवनावर केलेल्या टीकेला भाजपा नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेची मस्ती आल्यानेच संजय राऊत यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्दांचा वापर होत असल्याचं म्हटलं आहे. एवढेच नाही तर सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.
करोनामुळे विधान परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवड राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती करावी, या राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप निर्णय न घेतल्याने राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.
संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका करणारे ट्विट केले होते. ‘राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही, पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है,’ असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली होती.त्यांच्या या टीकेवर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणे यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून राजभवनावर टीका केल्याबद्दल संजय राऊत यांना उत्तर देत म्हटले आहे की, “राज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्य साधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहित नाही काय? सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही. समझने वालों को इशारा काफी है!”. नारायण राणे यांनी ट्विटमध्ये संजय राऊत यांनी टॅगदेखील केले आहे.