लखनौ – भाजपला संपूर्ण देशावर एकट्याचेच राज्य हवे आहे. त्यासाठी भाजप मनी पॉवरचा वापर करून इतर सर्व पक्षांना दुबळे करू पाहत आहे, असे टीकास्त्र शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शुक्रवारी सोडले. उत्तरप्रदेशातील बहराइचमध्ये पत्रकारांशी बोलताना टिकैत यांनी भाजपवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला.
उत्तरप्रदेशात काही महिन्यांपूर्वी झालेली विधानसभा निवडणूक भाजपने अप्रामाणिक मार्गांचा अवलंब करून जिंकली. विधानसभेच्या 100 पेक्षा अधिक जागांवरील निकालांमध्ये फेरफार करण्यात आले. भाजपच्या निर्देशावरून निवडणूक अधिकाऱ्यांनी ते केले, असा सनसनाटी आरोपही टिकैत यांनी केला. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेविषयी पत्रकारांनी विचारले. त्यावर ते उत्तरले, देशाच्या एकजुटीसाठी यात्रा हे चांगले पाऊल आहे. पण, ती यात्रा आधीच काढायला हवी होती.
सर्व विरोधकांनी रस्त्यांवर उतरायला हवे. अन्यथा, पुढील काळात सर्व पक्षांवर आणि आंदोलनांवर बंदी येईल, असा इशारा त्यांनी दिला. शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) हमी मिळण्यासाठी कायदा आणण्याच्या मागणीसाठी शेतकरी देशव्यापी आंदोलन करणार असल्याची माहितीही टिकैत यांनी दिली.