मुंबई – महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष आता फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. हा पक्ष वाचवण्यासाठी राज्यपालांचे निवासस्थान हे भाजपचे कार्यालय करण्यात आले असून तेथून राजकीय खेळ्या केल्या जात आहेत.
राज्यपालांनी महाविकास आघाडीच्या बारा आमदारांच्या नियुक्त्यांची फाईल रखडून ठेवणे हा याचाच एक भाग आहे असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. गेल्या निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षांतील अनेक जणांना भारतीय जनता पक्षाने आयात करून ठेवले आहे, पण त्यांना आता आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्याने आणि त्यांना सत्तेची कोणतीच आशा दिसत नसल्याने ते आता भाजप मधून परतण्याच्या तयारीत आहेत. अनेक आमदारही भाजप सोडण्याच्या मानसिकतेत आले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार पडणार आणि भाजचची सत्ता येणार असे स्वप्न दाखवून या लोकांना भाजपने सांभाळून ठेवले होते; पण आता दोन वर्ष होत आली तरी महाविकास आघाडीचे सरकार काही पडले नाहीं किंवा ते आता पडण्याची शक्यताही नाहीं. त्यामुळे भाजपमध्ये गेलेल्यांचे मनोधैर्य खच्ची होत आहे असेही पटोले यांनी म्हटले आहे.