राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1364
मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी करोना बाधित रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. राज्यात आज कोरोना बाधित 229 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1364 पोहोचली आहे.
तर करोनाबाधित 125 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून सध्या राज्यात 1142 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 30 हजार 766 नमुन्यांपैकी 28हजार 865जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 1364 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 36 हजार 533 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 4731 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण 4261 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 16 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
दरम्यान, आज राज्यात 25 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैंकी पुण्यातील 14, मुंबईतील 9 तर मालेगाव आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी 1 मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 15 पुरुष तर 10 महिला आहेत. आज झालेल्या 25 मृत्यूपैकी 12 जण हे 60 वर्षांवरील आहेत तर मुंबईत निधन झालेल्या एका महिलेचे वय 101 वर्षे आहे. 11 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत तर दोघेजण 40 वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 21 रुग्णांमध्ये (84 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.