“यूजीसी’चे आवाहन : विद्यापीठांना करून दिली आठवण
पुणे – देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांच्या पदवीदानासारख्या कार्यक्रमांसाठी खादीचेच कपडे वापरण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांना पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विद्यापीठे, राष्ट्रीय शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांना खादीच्या कपड्यांचा वापर करण्याचे आवाहन “यूजीसी’ने केले आहे.
यापूर्वीच “यूजीसी’ने विद्यापीठांमधील पदवी प्रदान सोहळ्यात भारतीय संस्कृती दिसण्यासाठी ब्रिटिश पद्धतीचा गाऊन आणि कॅप रद्द करण्याची सूचना दिली आहे. मात्र, अद्यापही अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये ब्रिटिश पद्धतीच्याच पोषाखाचाच वापर होताना दिसत आहे. त्यामुळे “यूजीसी’कडून भारतीय पोशाखासह खादीच्या कपड्यांचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. पदवी प्रदान सोहळा किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये खादीच्या कपड्यांचा कुलगुरूंसह इतर अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी वापर करण्याचे निर्देश “यूजीसी’ने परिपत्रकाद्वारे दिले आहेत. या पूर्वीही “यूजीसी’ने या संदर्भातील परिपत्रक विद्यापीठांना पाठवले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीचा वापर आणि चरख्याला पुनरूज्जीवित करण्यास प्राधान्य दिले आहे. महात्मा गांधी यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात हाताने तयार केलेले किंवा चरख्याने कातलेल्या सुताने तयार झालेल्या कापडाचा शस्त्राप्रमाणे वापर केला होता. त्यामुळे खादीला स्वातंत्र्याचा गणवेश म्हणून मान्यता मिळाली होती. खादी किंवा चरख्याद्वारे तयार झालेले कापड हे समृद्ध संस्कृती किंवा वारसाच आहे असे नाही, ग्रामीण भागातील उपजीविकेचे माध्यम आहे. त्यामुळे खादी किंवा हातमागाद्वारे तयार झालेल्या कपड्यांचा वापर करावा, असे “यूजीसी’चे सचिव रजनीश जैन यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.