वॉशिंग्टन – भारताबरोबरच्या सीमेवर तणाव वाढवल्याबद्दल आणि संरक्षणदृष्ट्या महत्वाच्या दक्षिण चीन समुद्राचे लष्करीकरण केल्याबद्दल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी चीनवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी “रॉग ऍक्टर’ (अप्रामाणिक, नकली कलाकार) अशा शब्दामध्ये चीनच्या सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीची संभावना केली आहे. “नाटो’ सारख्या संघटनांच्या माध्यमातून जगाने केलेली प्रगती चीनला पुसून टाकायची आहे आणि चीनला सहभागी करून घेणारे नवीन नियम आणि निकष प्रस्थापित करायचे आहेत, अशा शब्दात पॉम्पेओ यांनी चीनवर कडाडून टीका केली.
जगातील सर्वात जास्त लोकसंख्येची लोकशाही असलेल्या भारताच्या सीमेवर पीपल्स लिबरेशन आर्मीकडून तणाव वाढवला जात आहे. दक्षिण चीन समुद्राचे लष्करीकरण करून अधिक भागावरही चीनकडून दावा केला जात आहे, असे पॉम्पेओ म्हणाले. एकच दिवस आगोदर पॉम्पेओ यांनी गलवान खोऱ्यात शहिद झालेल्या भारतीय सैनिकांबद्दल सहवेदनाही व्यक्त केली होती.
पूर्व चीन समुद्रातील या समुद्रातील सेन्काकू बेटावर चीन दावा सांगत आहे. या बेटावर जपानचा दावा आहे. व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान यांनीही दक्षिण चीन समुद्रावर प्रति-दावे केलेले आहेत. या सागरी भागातील संभाव्य संघर्षाला तोंड देण्यासाठी अमेरिकेने तेथे लढाऊ विमानवाहू नौका आणि युद्धनौकाही तैनात केल्या आहेत.
शुक्रवारी कोपनहेगन लोकशाही समिटमध्ये युरोप आणि चीनचे आव्हान’ या विषयावर आपले विचार व्यक्त करताना पॉम्पेओ बोलत होते. गेल्या अनेक वर्षांपासून कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) च्या वर्तनात आणि चीनमधील लोकांच्या जीवनात बदल घडण्याची आशा पाश्चात्य देशांना वाटत राहिली आहे. “सीपीसी’ने नेहमीच आमच्या सद्भावनांचा फायदा घेतला आहे. आम्हाला सहकार्य करत असल्याचे भासवले आहे. चीनने वेळकाढूपणा करून स्वतःची क्षमता वाढवण्याचे धोरण अवलंबले आहे. ही अतिशय गुंतागुंतीची बाब आहे.
अनेक दशकांपासून युरोपीय कंपन्यांनी आशावादी राहून चीनमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र चीनने हॉंगकॉंगमधील मानवी हक्कांचे अवमूल्यन केले. संयुक्त राष्ट्राच्या कराराचा भंग केला. याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय करारांचा भंगही चीनने केला आहे. चीनमधील मुस्लिमांची दडपशाहीही जिनपिंग यांनी केली आहे. अशा प्रकारे मानवी हक्कांची पायमल्ली दुसऱ्या महायुद्धानंतरही कधी बघितली गेली नव्हती, असे पॉम्पेओ म्हणाले.
भारतीय सीमेवर तणाव वाढवून चीनने केवळ अप्रामाणिकपणाच दर्शवला नाही, तर शेजारधर्माचेही उल्लंघन केले आहे. चीनने करोना विषाणूचा प्रादुर्भावही वाढवला आणि जगभरात पसरवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेलाही दडपणाखाली आणून जगभरात मोठी जीवित आणि आर्थिक हानी घडवून आणल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार पॉम्पेओ यांनी केला.