वॉशिंग्टन – भारत-चीन सीमेवर काही महिन्यांपासून तणावाची स्थिती आहे. त्यावर अमेरिका लक्ष ठेऊन आहे. एवढेच नव्हे तर, ती स्थिती आणखी बिघडू नये अशी इच्छाही अमेरिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
चीनी कुरापतींमुळे सहा महिन्यांपासून भारताच्या लडाखलगत असणाऱ्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. त्या तणावाच्या काळात आणि एकंदरीतच व्यापक पातळीवर भारतापुढे सहकार्याचा हात करण्याची ग्वाही अमेरिकेकडून देण्यात आली आहे. संरक्षण सामग्रीची विक्री, संयुक्त लष्करी कवायती आणि माहितीची देवघेव आदी माध्यमांतून भारताच्या पाठिशी उभे असल्याचे ट्रम्प प्रशासनाकडून पुन्हा एकदा सूचित करण्यात आले. भारत आणि अमेरिकेत पुढील आठवड्यात 2+2 मंत्रिस्तरीय चर्चा होणार आहे.
दिल्लीत होणाऱ्या त्या चर्चेत दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री सहभागी होणार आहे. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक (3 नोव्हेंबर) तोंडावर येऊन ठेपली आहे. तसे असूनही मंत्रिस्तरीय चर्चेत सहभागी होत अमेरिकेने भारताविषयी वाटणारे महत्व अधोरेखित केले आहे. त्याशिवाय, पुढील महिन्यात चार देशांचा (क्वाड) समावेश असणाऱ्या नौदलांच्या संयुक्त मलबार कवायती होणार आहेत. त्यामध्ये भारत, अमेरिकेबरोबरच जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देश सहभागी होणार आहेत. त्या घडामोडींमुळे कुरापतखोर चीनला स्पष्ट संदेश जाणार आहे.