पुणे (प्रभात वृत्तसेवा) – मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एका रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 17 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाचा जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी.साळुंके यांनी फेटाळला.
कंपनीचे मेंटेनन्स हेड संदरेशन मोहन आणि प्रोडक्शन इनचार्ज संजय महाजन यांना अद्याप अटक झालेली नाही. पोलीस तपासात ज्या मशिनमध्ये ओव्हर हिट होवुन स्पार्क होवुन आग सुरू झाली. ती मशिन ओव्हर हिट होते, अशी तक्रार कामगारांनी वेळोवेळी मागील वर्षभर केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
कामगाराच्या कोणत्याही सुरक्षिततेचा विचार न करता मोठ्या प्रमाणावर केमिकल पावडर प्रोडक्शन आणि पॅकिंग रूम मध्ये आणली गेली. त्यामुळे आग पसरली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही.
गुन्हा दाखल असलेल्या काहींचा शोध घ्यायचा आहे. या सर्व बाबींचा विचार करून जामीन फेटाळण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.
निकुंज बिपीन शहा ( वय 39 रा. सहकारनगर) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. त्याचा दुबईत असलेल्या भाव केयुर आणि वडील बिपीन जयंतीलाल शहा ( वय 68 रा .सहकारनगर) या दोघांवर पौड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. त्यापैकी बिपीन यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
याप्रकरणी पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. 8 जून रोजी एस.व्ही अकवा कंपनीला आग लागून ही घटना घडली. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे न्यायालयीन कोठडीत असलेल्या निकुंज याचा जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.