मुदत संपूनही टाकला जातोय कचरा : ग्रामस्थांचा न्यायालयात जाण्याचा इशारा
पुणे – उरुळी देवाची कचरा डेपोमधील बायोमायनिंग प्रकल्पामध्ये शहरातील मिश्र कचरा डंपिंग करण्याची मुदत संपली असतानाही तेथे अजूनही कचरा टाकला जात असल्यामुळे आता ग्रामस्थांनी न्यायालयातच जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अनेकदा तक्रार, आंदोलन करूनही काही उपयोग न झाल्याने ग्रामस्थांनी न्यायालयाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे येथील बायोमायनिंग प्रकल्पामध्ये प्रक्रिया करण्यासाठी घेतला जाणारा मिश्र कचरा तातडीने बंद करावा, अशी मागणी फुरसुंगी आणि उरूळी देवाची येथील ग्रामस्थांनी गुरुवारी आयुक्तांकडे केली. एनजीटीच्या आदेशाचे उल्लंघन करून याठिकाणी मिश्र कचरा घेतल्यास महापालिकेविरोधात पुन्हा न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिल्याने येत्या काही दिवसांत कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील ग्रामस्थांचे प्रतिनिधी भगवान भाडळे, नगरसेवक गणेश ढोरे, तात्यासाहेब भाडळे, रणजित रासकर, विजय भाडळे आणि संजय हरपळे यांच्या स्वाक्षरीचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले.
उरुळी देवाची कचरा डेपोवरील कचरा डंपिंग 31 डिसेंबर 2019 मध्ये बंद करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवाद अर्थात एनजीटीने दिले आहेत. शहरातील कचऱ्याचे डंपिंग बंद करून त्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू करण्यात येत असल्याने महापालिकेने काही मुदत मागून घेतली होती. ही मुदत संपल्यानंतर ग्रामस्थांनी कचरा डेपोमध्ये मिश्र कचरा टाकण्यास विरोध करण्यासाठी मार्चमध्ये आंदोलन केले होते.
तांत्रिक कारणास्तव प्रकल्प उभारणीला विलंब लागत असल्याचे तसेच करोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे सहकार्य करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केल्याने मे महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच या मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम कोणत्याही निविदेशिवाय बायोमायनिंगचे काम करणाऱ्या “भूमीग्रीन’ या कंपनीलाच देण्यात आले होते. ही मुदत उलटून दीड महिना झाला आहे. मात्र, अद्यापही मिश्र कचरा टाकला जात असून, त्यावर कोणत्याही मुदतवाढीशिवाय प्रक्रिया सुरू आहे.