नागरिकांचे स्थलांतर करा : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर झेडपीचे 1300 ग्रामपंचायतींना आदेश
पुणे – मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पडझडीच्या दुर्घटना घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने तत्काळ धोकादायक इमारती, घरांचा शोध घेण्याचे आदेश 1,300 हून अधिक ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.
या धोकादायक स्थितीतील घरांचा शोध घेऊन तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सूचित करण्यात आले. जिल्ह्यातील विशेषत: जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने पावसामुळे पडझड, दरड कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने या तालुक्यांमधील गावांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसामुळे जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना शक्यता जास्त आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने या तालुक्यांतील ग्रामसेवक, तलाठी, तसेच ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना याबाबत सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. यापूर्वी खेडमध्ये अशा प्रकारची घटना घडली होती.
तसेच घाटमाथ्यावरील परिसरातील तालुक्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. या भागात दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक भागातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्त्यांतील अडथळे दूर करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेऊन याबाबत सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्वतंत्र निधीही मिळणार ः आयुष प्रसाद
दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत ग्रामपंचायतींना धोकादायक इमारती, घरांचा शोध घेण्याच्या सूचना देण्याचे आदेश दिले होते. तसेच धोकादायक घर आढळल्यास संबंधित कुटुंबाला स्थलांतरित करण्यासाठी जिल्हा परिषदेला निधी मिळणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.