लखनौ – उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागातील करोनाची स्थिती अत्यंत बिकट असून तेथील सारीच व्यवस्था रामभरोसे आहे, अशी टिप्पणी आज झालेल्या सुनावणीच्यावेळी हायकोर्टाने केली आहे.
कोविड स्थितीच्या पार्श्वभूमीवर रुग्णांवर चांगले उपचार करणारी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका कोर्टाच्या एक खंडपीठापुढे सुनावणीला आली असून त्याच्या सुनावणीच्यावेळी हायकोर्टाने ही टिप्पणी केली.
कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारच्या कोविड हाताळणीबाबत नाराजी व्यक्त करून म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून आम्ही ज्या स्थितीचे अवलोकन केले आहे त्यातून आरोग्य उपचार आणि सुविधांची परिस्थिती फारच बिकट आहे.
सामान्य स्थितीत ही सरकारी आरोग्य व्यवस्था नीट काम करू शकत नसेल तर या महामारीच्या काळात त्या व्यवस्थेची अशी दुर्दशा होणे स्वाभाविकच आहे असेही कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने यावेळी बिजनौर च्या सरकारी रुग्णालयातील स्थितीची माहितीही स्वतःच वानगीदाखल सादर केली आणि त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.