पुणे -राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढण्याचा नेत्यांचा विचार आहे.
पण खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रमुख नेत्यांमध्ये तू-तू-मै-मै सुरू आहे. त्यामुळे खेडमध्ये तरी “आघाडी’त “बिघाडी’ निश्चित मानली जात असून निवडणुकांच्या कामांना सर्वच पक्षांनी सुरुवात केली आहे.
तर कमी पडू नये म्हणून स्वबळाचीही चाचपणी पक्षनेते करीत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीसह भाजपमध्ये ही हौशी उमेदवारांची संख्या मोठी असणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.
जिल्हा परिषद म्हणजे मिनी विधानसभा मानली जाते, त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील आणि पहिल्या फळीतील नेत्यांचे निकटवर्तीय इच्छुक असतात त्यामुळे कोणाला तिकिट द्यावे, या विवंचनात नेते असल्याने ते अखेर निकषांचा अवलंब करतात, त्या निकषांमध्ये अर्धेअधिक गळून गेल्याने नेत्यांची डोकेदुखी थोडी कमी होते.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे ताकद एकसमान आहे. तर त्यांना तोडीसतोड देण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. त्यामुळे एकमेकांना कमीपणा दाखवण्यासाठी तिनही पक्षातील नेते, कार्यकर्ते कसलीच कसर सोडत नाही.
त्यातच आगामी निवडणुकांसाठी पक्ष बळकट करण्यासाठी विरोधी पक्षातील आघाडीचे कार्यकर्ते गळाला लावण्यासाठी तिनही पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता तरी शिवसेना-भाजप यशस्वी झाले आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधी पक्षातील कोणता कार्यकर्ता गळाला लावणार का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
कॉंग्रसच्या भूमिकेकडे लक्ष
खेड विधानसभा मतदारसंघात तशी कॉंग्रेसची ताकद अगदी नगण्य असली तरी आता महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघात आपले बस्तान घट्ट करण्यासाठी आगामी निवडणुकीत संधी मिळेल की प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्व बळाच्या भूमिकेमुळे स्व बळावर निवडणुका लढणार का, यासाठी कॉंग्रेसच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
…तोपर्यंत वेट अँड वॉच
पुढील विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी 2019च्या निवडणूक आखाड्यात जाहीर केले होते. तर शिवसेनेचे माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांच्या निधनाने शिवसेनाला धक्का बसला आहे.
त्यामुळे दोन्हीही पक्षांकडे आतातरी आमदारकीसाठी तसा तुल्यबळ उमेदवार नसल्याने आमदारकीसाठी नवीन चेहरा येणार की पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्याला आगामी निवडणुकांमध्ये पुढे करणार हे येणारा काळच ठरवेल, तोपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका पार पाडावी लागणार.
शिवसेनेने ताकद वाढवली
पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तथा केळगावचे माजी सरपंच सोमनाथ मुंगसे यांनी नुकतीचे शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागात शिवसेनेला बळकटी मिळाली आहे. त्यामुळे आगामी कोणत्या निवडणुकीसाठी त्यांचा विचार केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून मोट बांधण्यास सुरुवात
खेड तालुक्यात भाजपनेही जोरदार वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे आगामी सर्वच निवडणुकांमध्ये तीनही पक्षांत तुल्यबळ लढती रंगण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार भाजपनेही तयारी सुरू केली आहे.
त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 10 वर्षे तालुकाध्यक्ष पदावर विराजमान राहिलेले तथा चाकण औद्योगिक वसाहती परिसरातील वाकी येथील शांताराम भोसले यांना गळाला लावून औद्योगिक वसाहतीत ताकद वाढवण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण सुरू केले आहे. त्यामुळे भोसले यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी पडणार असल्याचे बोललेले जात आहे.