करोनामुळे चीनमधील मागणी व उपभोग घटला आहे. अनेक कमॉडिटीजचे भाव कोसळत आहेत. त्यात कॉफीचाही समावेश होतो. जेव्हा मागणी कमी होते, तेव्हा निर्यातीच्या बाजारपेठेत जो देश स्पर्धाक्षम नसतो तो अधिक मागे पडत असतो.
चीनमधील करोना विषाणूच्या संसर्गामुळे तेथील 900 पेक्षा जास्त बळी गेले असून, अनेक भागांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतातही केरळ व अन्य ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळले. महाराष्ट्रालाही याबाबतची सावधगिरी बाळगावी लागणार आहे. चीनची अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे. चीनमधून येणाऱ्या वस्तूंच्या आयातीस फटका बसणार असून, त्यामुळे भारतातील रंग आणि रसायन उद्योगांच्या मालाला अधिक मागणी निर्माण होऊ शकते; परंतु त्याचवेळी चीनमधील धातू उद्योग हा मोठा असून, तो थंडावल्यास त्याचा भारतीय कंपन्यांना फायदा होईल की नाही, याबद्दल नक्की काहीच सांगता येत नाही. मात्र, भारतातील कृषिरसायने, खते, औषधे या उत्पादनांसाठी चीनमधून कच्चा माल आयात केला जातो. तो पुरवठा खंडित झाल्यास पंचाईत होईल. एकीकडे करोनामुळे खनिज तेलाची आयात किंमत 13 टक्क्यांनी घसरणे हे भारताच्या दृष्टीने लाभदायक आहे; परंतु त्याचवेळी मुंबई, दिल्ली वगैरे महानगरांतील अनेक बाजारपेठांमध्ये चिनी मालाची तुफान विक्री केली जाते. चीनमधील विविध कारखाने व बाजारपेठा बंद असल्यामुळे, भारतातील अनेक व्यापारी हवालदिल झाले आहेत. 15 जानेवारीनंतर चीनहून माल घेऊन येणारी जहाजे आलेलीच नाहीत.
अमेरिका व चीनमध्ये वर्षभर व्यापारीयुद्ध सुरू होते. त्यास अलीकडेच तात्पुरती तरी स्थगिती मिळाली होती. त्यामुळे जागतिक व्यापाराबाबत आशादायक परिस्थिती निर्माण झाली असतानाच करोनाचे संकट उद्भवले. जवळपास वीस देशांत करोनाचा संसर्ग पसरलेला आहे. जगातील करोडो गुंतवणूकदारांनी आपले समभाग विक्रीस काढले आहे.
चीनमधील वुहान या शहरात प्रथम करोनाचे विषाणू आढळले. जगभरातील काही हजारांतील लोकांना त्याची बाधा झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तर चीनमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर केलेली आहे. 23 विकसनशील देशांच्या बाजारपेठांचा एमएससीआय वर्ल्ड इंडेक्स तयार केला जातो. त्यात मध्यम व बड्या कंपन्यांच्या समभागांचा समावेश होतो. हा निर्देशांक सुमारे दोन टक्क्यांनी घसरला आहे.
वुहानमधील होंडा मोटर कंपनी व निस्सान मोटर कंपनीने आपल्या कामगारांना तेथून बाहेर काढले आहे, तर थीम पार्क्स ऑपरेटर्स, चित्रपटगृहे, हॉटेल्स, रिटेलर्स यांचे कामही थंडावले आहे. नववर्षाचे स्वागत व त्यानंतरच्या उत्सवांसाठी संपूर्ण चीनमध्ये सुटी घोषित केली जाते. यंदा ही सुटी 25 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत जाहीर केली आहे, ती आता वाढवली जाण्याची शक्यता आहे. 2003 साली सार्सच्या संसर्गामुळे 17 देशांमधील 800 लोक मरण पावले होते. त्याचेही मूळ दक्षिण चीनमध्येच होते. सार्समुळे आशिया पॅसिफिक पट्ट्यातील विमान कंपन्यांचे 39 अब्ज रेव्हेन्यू पॅसेंजर किलोमीटर्स एवढे नुकसान झाले होते. सार्समुळे जगाचे 33 अब्ज डॉलर्स इतके नुकसान झाले. जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 0.1 टक्के इतकी ही हानी होती. पूर्व आशियाई देशांना वीस अब्ज डॉलर्स इतका फटका बसला होता; परंतु त्यावेळी अमेरिका मंदीतून बाहेर येत होती व इराकवर आक्रमण करण्याच्या तयारीत होती. तेव्हा वित्तीय बाजारपेठांना कमी फटका बसला होता.
2020 मध्ये जगाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज आहे. सारासार विचार केला तर जगामधील अर्थव्यवस्था वधारण्याच्या दिशेने जात असतानाच, करोनामुळे ही संधी हुकण्याची भीती निर्माण झाली आहे. चीनसारखा बलाढ्य देश जर घायाळ झाला, तर त्याचा सर्वांवरच परिणाम होणार; परंतु चीन जायबंदी झाल्याचा भारतास सर्वांगाने फायदा होईल, असे मानणे मात्र भाबडेपणाचे ठरेल.
उत्पादन वाढल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यास, ते स्वागतार्हच असेल. कारण त्यामुळे जगातील विविध देशांची उत्पादकता वाढते व खरेदीशक्तीही. या कारणाने जागतिक मागणी वाढून सर्वांचाच फायदा होतो. परंतु जागतिक मागणी कमी झाल्यामुळे जर तेलाचे भाव घसरले असते, तर त्याचा तडाखाही बसतो. याचे कारण इलेक्ट्रॉनिकचे सुटे भाग, औषधी घटक वगैरे असंख्य वस्तूंची भारत चीनला निर्यात करतो. एवढंच नव्हे, तर अन्य अनेक देशांना भारताचा वेगवेगळ्या प्रकारचा माल निर्यात केला जात असतो. मागची सहा वर्षे भारताची निर्यात कुंठितावस्थेत आहे. करोनामुळे जागतिक मागणीच जर कमी झाली, तर भारतीय निर्यातीचा बोऱ्या वाजेल. निर्यात बाजारपेठेत हुकूमत निर्माण करण्यासाठी भारतातील मालाच्या किमती कमी असणे व त्याची गुणवत्ता उंचावणे या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. किमती कमी होण्याकरिता भारतातील जमीन, भांडवल, वीज, वाहतूकभाडी आणि एकूणच लॉजिस्टिकल खर्च हा कमी असला पाहिजे.
मारुतीसारखी कंपनी चीनमधून अनेक सुटे भाग व कच्चा माल आयात करत असते. महिन्याभराची गरज भागेल इतका माल त्यांच्याकडे असला, तरी त्यानंतरचा प्रश्न उद्भवू शकतो. कारचा एखादा जरी सुटा भाग नसला, तरीसुद्धा अशा भागाशिवायची गाडी रस्त्यावर पाठवता येत नाही. आधीच भारतातील कार्सच्या वाढलेल्या किमती व संथ मागणी हे प्रश्न भेडसावत आहेत. स्वस्त पतपुरवठाही उपलब्ध नाही. त्यामुळे गेल्या वर्षी कारच्या खपात वीस टक्क्यांनी घट झाली, तर स्कूटर्स व मोटरसायकल्सच्या विक्रीत चौदा टक्क्यांनी.
करोनाचा वाहतूक व्यवसायावरही परिणाम होणार आहे. अनेक देशांत प्रवासी निर्बंध आल्यामुळे एकूणच देशा-देशांमधला आयात-निर्यात व्यापार कमी होणार आहे. बाजारात येणाऱ्या नवीन स्मार्टफोन्सच्या विक्रीचे शुभारंभ पुढे ढकलण्यात येत आहेत. जीवनावश्यक औषधे व प्रतिजैविकांच्या पुरवठ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत चीनमधून 70 अब्ज डॉलर्स मालाची आयात करतो आणि 17 अब्ज डॉलर्सची निर्यात करतो. म्हणूनच करोनाबाबत सावधगिरीने योग्य उपाययोजना सरकारने केल्या पाहिजेत.
प्रा. अविनाश कोल्हे