लखनऊ – हाथरस प्रकरणानंतर उत्तरप्रदेश पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार प्रकरणाने हादरला आहे. एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशमधील बदायू जिल्ह्यामध्ये ही धोकादायक घटना घडली आहे. याबाबतची तक्रार बदायू जिल्ह्यातील उघैती या छोट्या गावातील पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. पीडित महिला गेल्या रविवारी संध्याकाळी मंदिरात गेली होती. मात्र, ती परतलीच नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
तर रात्री १२ च्या सुमारास या रक्तबंबाळ अवस्थेतील पीडितेला टाकून दोन इसमांसहित असलेल्या एका कार चालकाने पलायन केले असल्याचा आरोप गावातील स्थानिकांनी केला आहे. मध्यरात्री तिचे निधन झाले. दरम्यान, या घटनेतील आरोपींनी तिला कारमधून चंदौसी येथे उपचारांसाठी नेले असल्याचेही समजते आहे.
पीडितेच्या नातेवाईकांनी म्हंटले कि, तक्रार दाखल करुनही उघैती पोलिस स्टेशनचे ऑफिसर रविंद्र प्रताप सिंह हे वेळेवर पोहोचले नाहीत. या पीडितेचा मृतदेह तब्बल १८ तासांनी म्हणजे सोमवारी दुपारी पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला, असा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी पोलिसांवर केला आहे.
पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार, या पीडितेच्या गुप्तांगांत अनेक जखमा आढळून आल्या आहेत. या महिलेची बरगडी व पाय मोडला होता. तसेच तिच्या फुप्फुसावर जोरदार हल्ला करण्यात आला होता. तीव्र रक्तस्त्राव देखील होत होता.
दरम्यान, या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी चार जणांची टीम बनवली आहे. या घटनेतील संशयित आरोपी महंत बाबा सत्यनारायण, त्याचा सहाय्यक वेदराम आणि ड्रायव्हर जसपाल यांचा शोध सुरु आहे. आरोपी सध्या फरार आहेत.