Smart Meter : उत्तर प्रदेशातील वीज ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. राज्यातील जुन्या वीज मीटरच्या जागी ‘स्मार्ट मीटर’ (Smart Meter) बसवण्याच्या प्रक्रियेला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. तांत्रिक समितीचा अहवाल येईपर्यंत ही प्रक्रिया थांबवण्यात आली असून, ग्राहकांना वीज कापणीपासूनही मोठा दिलासा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे ऊर्जा आणि नगरविकास मंत्री ए.के. शर्मा यांनी एका आढावा बैठकीत या निर्णयांची घोषणा केली. वीज वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि ग्राहकभिमुख करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यभरात प्रीपेड स्मार्ट मीटर्स बसवण्याविरोधात होत असलेल्या व्यापक विरोधाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. काय आहेत सरकारचे नवे आदेश? (Smart Meter) जोपर्यंत तांत्रिक समिती आपला अहवाल सादर करत नाही आणि त्याची पूर्ण तपासणी होत नाही, तोपर्यंत राज्यात जुन्या मीटरऐवजी स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम तत्काळ प्रभावाने थांबवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी नुकतेच स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत, अशा ग्राहकांना विशेष सवलत देण्यात आली आहे. १५ दिवसांचा ‘कन्वर्जन पिरियड’ आणि त्यानंतरचे ३० दिवस, असे एकूण ४५ दिवस कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन कापले जाणार नाही. हेही वाचा – 7.5 तीव्रतेचा भीषण भूकंप; जपानमध्ये त्सुनामीचा इशारा शून्य बॅलन्सवरही वीज सुरू राहणार – Smart Meter : स्मार्ट मीटर बसवण्याला स्थगिती; उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी नवीन तरतूद करण्यात आली आहे. ज्यांचे लोड २ किलोवॉटपर्यंत आहे, अशा ग्राहकांचा बॅलन्स शून्य झाला तरी जास्तीत जास्त ३ दिवस किंवा २०० रुपयांच्या मर्यादेपर्यंत त्यांची वीज खंडित केली जाणार नाही. पाच स्तरांवर मिळणार ‘एसएमएस’ अलर्ट – ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक रकमेची माहिती देण्यासाठी सरकारने ५-स्तरीय एसएमएस अलर्ट (SMS Alert) प्रणाली लागू केली आहे. यामुळे ग्राहकांना बॅलन्स ३० टक्क्यांवर आल्यावर, बॅलन्स १० टक्क्यांवर आल्यावर, बॅलन्स शून्य झाल्यावर, वीज कनेक्शन कापण्याच्या एक दिवस आधी, कनेक्शन कापल्यानंतरचा अंतिम संदेश, अशावेळी एसएमएस अलर्ट मिळतील. सुट्टीच्या दिवशी वीज कापली जाणार नाही – सरकारने स्पष्ट केले आहे की, रविवार किंवा इतर सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी ग्राहकांचा बॅलन्स उणे (Negative) झाला तरीही त्यांचे वीज कनेक्शन कोणत्याही परिस्थितीत कापले जाणार नाही. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सूचना – वाढत्या उष्णतेचा विचार करून ऊर्जा मंत्र्यांनी सर्व वीज वितरण कंपन्यांना अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रान्सफॉर्मर बदलण्यास विलंब करू नका आणि लोंबकळणाऱ्या तारा किंवा स्पार्किंगच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करा, अशा कडक सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.