मुंबई – इ. स.1952 नंतर प्रथमच भारताचा विकास दर कमी होऊन उणे 7.7 टक्के इतका होणार आहे. असे असताना शेअर बाजाराचे निर्देशांक मात्र प्रचंड वाढले आहेत. ही तफावत चिंताजनक आहे असे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.
लॉकडाउन वेळी अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्यानंतरही आतापर्यंत शेअर बाजाराचे निर्देशांक 15 टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र दरम्यानच्या काळामध्ये पहिल्या तिमाहीतील विकास दर उणे 23.9 टक्के तर दुसऱ्या तिमाहीतील विकास दर उणे 7.7 टक्के इतका भरला आहे.
पूर्ण वर्षाचा विकास दर उणे 7.5 टक्के होण्याची शक्यता रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केली आहे. 1952 नंतर भारताचा विकास दर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कोसळणार आहे. याचे प्रतिबिंब शेअर बाजार निर्देशांकांवर पडण्याऐवजी शेअर बाजाराचे निर्देशांक एकतर्फी वाढत आहेत.
मार्च 2020 मध्ये शेअर बाजार निर्देशांकांत 40 टक्क्यांची घट झाली होती. मात्र त्यानंतर अर्थव्यवस्था फारशी चांगली नसताना शेअर बाजार निर्देशांकात भरमसाठ वाढ झाली आहे. हा अनेकांच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे.
भारत सरकारसह विविध देशांनी करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून उद्योगांना आणि जनतेला बाहेर पडता यावे याकरिता भांडवल सुलभता निर्माण केली आहे. यामुळे बाजारात भरपूर पैसा आहे. या कारणामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक फुगत आहेत असे बऱ्याच विश्लेषकांना वाटते. मात्र गुंतवणूकदारांनी आता तारतम्यभावाने निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
निर्देशांकांच्या वाढीबरोबरच बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. गेल्या वर्षी अनुत्पादक मालमत्ता 7.5 टक्के होती. तरीही चिंता व्यक्त केली जात होती. आता ही अनुत्पादक मालमत्ता 13.5 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या विषयाकडे बॅंकांनी आणि केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.