लखनौ, दि. 26 – उत्तरप्रदेशात येत्या 15 एप्रिल पासून चार टप्प्यांमध्ये पंचायत निवडणूका घेतल्या जाणार आहेत. या निवडणूका 15,19 26 आणि 29 एप्रिल रोजी होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज हा कार्यक्रम जाहीर केला.
यात ग्राम पंचायत, सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्यांच्याही निवडणूका घेण्यात येतील. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना महत्व आले आहे. उत्तरप्रदेशात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक किसान महापंचायती घेण्यात आल्या असून त्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
त्यात भाजपच्या राज्य तसेच केंद्रातील सरकारवर जोरदार रोष व्यक्त करण्यात आला आहे. त्यातून भाजपचा ग्रामीण भागातील पाठिंबा कायम आहे की कमी झाला आहे याची कसोटी लागणार असल्याने या निवडणुकांना महत्व आले आहे.