मुंबई : भाजपाने पाच राज्यांच्या निवडणुकीत चार राज्यात मोठे यश मिळाले आहे. पण त्यांना पंजाबमध्ये विजय मिळवता आला नाही. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेस आणि भाजपाचा मोठा पराभव केला. दुसरीकडे शिवसेनेला उत्तर प्रदेश आणि गोव्यात अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
लोकशाहीत हार-जीत होत असते. त्यामुळे आम्हाला भाजपच्या विजयाने दु:ख होण्याचे कारण नाही. आम्ही भाजपच्या आनंदात सहभागी आहोत. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती मतं मिळाली, असा प्रश्न भाजपचे नेते विचारतात. पण मग पंजाबमध्ये भाजपची अवस्था काय झाली? प्रखर राष्ट्रवादी भाजपला पंजाबमध्ये विजय का मिळाला नाही, उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि शिवसेनेचा जो पराभव झाला त्यापेक्षा वाईट अवस्था भाजपची पंजाबमध्ये झाली,असे संजय राऊत म्हणाले आहेत.
“उत्तराखंडचे मुख्यमंत्री हारले, गोव्यात दोन उपमुख्यमंत्री हारले. पण पंजाब सर्वात चिंतेचा विषय आहे. पंजाबसारख्या सीमावर्ती भागात तेथील लोकांनी राष्ट्रीय आणि प्रखर राष्ट्रवादी पक्ष भाजपाला पूर्णपणे नाकारलं. प्रधानमंत्री, गृहमंत्री, रक्षामंत्री सर्वांनी झोकून प्रचार केला तरी ते का हारले? उत्तर प्रदेश तर तुमचंचं होतं, उत्तराखंडही तुमचंच होतं, गोवाही तुमचं होतं. उत्तर प्रदेशमध्ये किती जागा मिळाल्या म्हणून आम्हाला बोलत आहात ना. तिथे काँग्रेस आणि शिवसेनेचा जो पराभव झाला आहे त्यापेक्षा मोठा पराभव तुमचा पंजाबमध्ये झाला आहे. त्याबद्दल देशाला मार्गदर्शन करा,” असा टोला संजय राऊतांनी लगावला.
“या पाच राज्यांच्या निवडणुकीचा आणि मुंबई पालिकेचा काही संबंध नाही. गेली ५० वर्ष आम्ही पालिका लढत असून पालिकेवर भगवाच झेंडा कायम राहील,” असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. भाजपा नेत्यांकडून ‘युपी झांकी है, महाराष्ट्र बाकी है’ घोषणा दिल्या जात असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “पश्चिम बंगालच्या आधीही अशा घोषणा देत होते. पवारांनी आपण तयार असल्याचं सांगितलं आहे ना. काय करणार आमच्यावर धाडी टाकणार, खोटे गुन्हे दाखल करणार अजून काय करु शकता. जे हवं ते करा आम्हीही तयार आहोत”.
मोदींनी तपास यंत्रणांवर दबाब टाकला जात असल्याचं म्हटलं आहे. त्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “चुकीच्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. एकाच पक्षाचे, आघाडीचे लोक टार्गेट केले जात आहेत, यावर बोललं पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय दबावाखालीच काम करत असल्याच्या मताशी महाविकास आघाडी ठाम आहे. कोणी काही बोललं तर आमच्या मतामध्ये फरक पडणार नहाी. हे मी बोलल्यानंतर १० मिनिटात माझ्या घरावर धाड पडली तरी मी घाबरत नाही. राजकीय कारणासाठीच आमच्यावर हल्ले करत आहात हे थांबवा असं आम्ही सांगतो तेव्हा तो दबाव कसा असू शकतो? सत्य सांगणं दबाव आहे का? सत्य ऐकण्याची तयारी ठेवा”.