लखनौ – उत्तर प्रदेशातील जनतेने ‘डबल इंजिन’ सरकारला जनादेश दिला आहे. राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असून सत्तेच्या चाव्या राखण्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यश आले आहे. २०१७ मध्ये भाजप व मित्रपक्षांनी ३१२ जागा जिंकत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन केले होते. यंदा भाजपच्या जागा २०१७ च्या तुलनेत कमी होताना दिसत असल्या तरी बहुमताचा जादुई आकडा मात्र सहज पार करण्यात यश आलं आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये मिळवलेला विजय हा एका अर्थाने विक्रमीच म्हणावा लागेल. उत्तर प्रदेशमध्ये १९८५ नंतर कोणत्याही पक्षाच्या सरकारला आपला ५ वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पुढील निवडणूक जिंकून सत्तेच्या चाव्या राखण्यात यश आले नव्हते.
मात्र आता तब्बल ३७ वर्षांनंतर योगी आदित्यनाथ यांनी ही किमया करून दाखवली आहे. योगी यांनी २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.
यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळाल्याने ही भाजप व योगींची उत्तर प्रदेशातील सलग दुसरी टर्म ठरणार आहे.दरम्यान, निवडणूक झालेल्या पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपने बहुमत प्राप्त केले असून पंजाबमध्ये सत्तेच्या चाव्या आम आदमी पक्षाकडे जाणार आहेत.
पंजाबमध्ये आपला जबरदस्त यश मिळाले असून ११७ पैकी ९२ जागांवर आप उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. काँग्रेसला मात्र कोणत्याही राज्यामध्ये समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही.