लखनौ – कॉंग्रेसने उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 12 हजार किमीची यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढली जाणार आहे.
कॉंग्रेसची ही यात्रा प्रतिज्ञा यात्रा या नावाने काढली जाणार असून यात हम वचन निभायेंगेचे वचन दिले जाणार आहे. प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्ष नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात्रेचा तपशील येत्या काही दिवसांत निश्चीत केला जाणार आहे.
उत्तरप्रदेशातील प्रत्येक गावातून ही यात्रा जाईल असे याचे नियोजन केले जात आहे. या यात्रेच्या प्रस्तावित मार्गाच्या संबंधात पक्षाच्या नेत्याकडून सुचना मागवल्या गेल्या आहेत. त्या आल्यानंतर त्यानुसार यात्रेचा मार्ग ठरवला जाईल.
प्रियांका गांधी सध्या उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर आल्या असून त्या सर्व पातळ्यांवरील पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा घेत आहेत.