लखनौ – उत्तर प्रदेशातील भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांनी दुसऱ्यांदा समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये आघाडीवर चर्चा झाली. त्यामुळे भीम आर्मी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भीम आर्मी आणि समाजवादी पार्टीची आघाडी झाल्यास बसपा अध्यक्ष मायावती यांची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चंद्रशेखर आझाद यांनी आज सकाळीच अखिलेश यादव यांची भेट घेऊन त्यांच्याशी आघाडीबाबत चर्चा केली. त्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी मीडियाशी संवाद साधून भाजपला पराभूत करण्याचा मनसुबा व्यक्त केला. समाजवादी पार्टीसोबत मिळून आम्ही भाजपला पराभूत करणार आहोत.
देशात सर्वाधिक अत्याचार दलितांवर होत असतात. त्यामुळे मी नेहमीच दलितांची बाजू घेऊन उभा असतो, असे सांगतानाच आम्ही विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आझाद समाज पार्टी उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, असा दावाही त्यांनी केला.
जयंत चौधरी यांच्या नंतर चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत अखिलेश यादव यांनी आघाडी केल्यास पश्चिम यूपीत दलित-मुस्लिम आणि जाट असे समीकरण तयार होईल. संपूर्ण उत्तर प्रदेशात जाट समाजाची लोकसंख्या 4 टक्के आहे. तर पश्चिम यूपीत जाट समाजाची लोकसंख्या 20 टक्के आहे. तर मुस्लिमांची लोकसंख्या 30 ते 40 टक्के आहे. तसेच दलितांची लोकसंख्या 25 टक्के आहे. त्यामुळे या आघाडीच्या प्रयोगाचा समाजवादी पार्टीला मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.