अमेठीतील सभेत राहुल गांधी यांचा आरोप
अमेठी – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मित्रांनी भारताच्या रोजगाराचा कणा मोडला आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज येथील जाहीर सभेत बोलताना केला. ते म्हणाले की, यापुढील काळात भारतातील शिक्षित युवकांना रोजगार मिळणे दुरापास्त होणार आहे. तुम्ही कितीही शिकलेले असाल तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.
आपण करीत असलेल्या दाव्यात तथ्य आहे, असे नमूद करताना ते म्हणाले की, कोविड काळातही मी या धोक्याची जाणीव करून दिली होती, पण माझे म्हणणे त्यांनी दुर्लक्षित केले. त्याचा परिणाम तुम्हाला येथे गंगेत वाहून आलेली प्रेते दिसली असे ते म्हणाले. अमेठीत पाचव्या टप्प्यात मतदान होत असून त्यासाठी राहुल गांधी हे येथील प्रचारात उतरले आहेत. या टप्प्यात 60 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. राहुल गांधी म्हणाले की, या निवडणूक काळात पंतप्रधान मोदींच्या अनेक सभा झाल्या पण त्यांनी कधीही रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला नाही.
मोदींनी 2014 च्या निवडणुकीत रोजगाराच्या संबंधात लोकांना मोठमोठी आश्वासने दिली होती, पण त्यानंतरच्या काळात किती लोकांना त्यांनी रोजगार पुरवला याची माहिती ते का देत नाहीत असा सवाल त्यांनी केला. निदान यापुढील काळात नेमक्या किती लोकांना ते नोकऱ्या देणार आहेत यावर तरी ते भाष्य का करीत नाहीत असा सवालही त्यांनी केला. जेव्हा ते (भाजप) म्हणतात की कॉंग्रेसच्या 70 वर्षांच्या काळात देशात काहीही झाले नाही, तेव्हा त्यांचा अर्थ असा असतो की या 70 वर्षांत अंबानी, अदानी यांच्यासाठी काहीही झाले नाही.
भारतातील सर्वात मोठे अब्जाधीश रोजगार देत नाहीत, छोटे दुकानदार, व्यापारी आणि शेतकरी रोजगार देऊ शकतात असेही त्यांनी नमूद केले. पण हाच वर्ग भाजपच्या काळात कोलमडून पडला आहे असे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादण्याचा प्रयत्न केला असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.