बांदा, चित्रकूट – उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यामध्ये बुंदेलखंडमध्ये मतदान होणार आहे. भाजपने या भागात नदी जोड प्रकल्प आणि संरक्षण औद्योगिक कॉरिडोरसारख्या मेगा प्रोजेक्टवर विशेष भर दिला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशच्या प्रथेप्रमाणे उमेदवार निश्चितीसाठी जातीची समीकरणेही बघितली गेली आहेत. 2017 मध्ये बुंदेलखंडमधील सर्व 19 जागांवर भाजपने विजय मिळवला होता.
यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारात कल्याणसिंह आणि उमा भारती या ज्येष्ठ नेत्यांची प्रथमच अनुपस्थिती आहे. बसपाने आपल्या उमेदवारांच्या निश्चितीसाठी लोधी समाजाबरोबर दलित उमेदवारांना प्रधान्य दिले आहे, तर कॉंग्रेसचे दिवंगत आमदार विवेक सिंग यांच्या पत्नींना उमेदवारी देऊन समाजवादी पार्टीने जनतेच्या सहानुभूतीचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रियंका गांधी यांनी जरी “लडकी हूं, लड सकती हूं’ असा नारा दिला असला तरी कॉंग्रेसच्या अन्य उमेदवार लक्ष्मी नारायण गुप्ता यांच्याबद्दल कोणालाच विशेष माहिती नाही. सपाने तर शिवकुमार पटेल उर्फ दादुओ नावाच्या एका दरोडेखोराच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. जाटव, ब्राह्मण, दलित आणि लोधी हे या भागातील प्रमुख समाज गट आहेत आणि या प्रत्येक समाजाचे उमेदवार रिंगणात उतरवून तिन्ही प्रमुख पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपने जातीच्या समीकरणाबरोबर मेगा प्रोजेक्टवरही भर दिला आहे. केंद्राने अलीकडेच केन-बेटवा नदी जोड प्रकल्प, हर घर नळ, संरक्षण औद्योगिक कॉरिडोर, बुंदेलखंड एक्स्प्रेस वे, चित्रकूट येथील विमानतळ आणि धार्मिक पर्यटनाच्या धोरणांतर्गत चित्रकूट धामचा विकास आदी प्रकल्प मार्गी लावले आहेत. या सर्व मेगा प्रकल्पांच्या माध्यमातून बुंदेलखंडचे अर्थकारण वेगाने वाढेल, असा दावा भाजपकडून केला जातो आहे. मात्र, ही विकासकामे 2017 मध्ये सपाच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली होती, असा दावा अखिलेश यांच्या समर्थकांकडून केला जातो आहे, तर याच कामांना मंजुरी 2007 मध्ये मायावती मुख्यमंत्री असताना मिळाली होती, असा दावा बसपाकडून केला जातो आहे.