मुंबई – राज्यात सध्या पोटनिवडणुकांचे वारे सुरु आहे. त्यासोबतच गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सत्ता संघर्षाची सुनावणी देखील रोज होत आहे. या सर्व कारणांमुळे राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना आता शिवसेनेच्या एका रणरागिणीने उद्धव ठाकरे जोपर्यंत मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत चप्पल न घालण्याचा प्रन केला आहे.
एकनाथ शिंदे हे आमदारांचा वेगळा गट घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता. यानंतर अनेक शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला होता. यानंतर आता शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्तीने देवी चरणी अनोखी प्रतिज्ञा केल्याचे समोर आले आहे. आशा रसाळ असं या महिलेचे नाव असून अनेक वर्षांपासून त्या शिवसेनेचे काम करताहेत.
कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गा माता मंदिरामध्ये देवीच्या चरणी रसाळ यांनी ही प्रतिज्ञा केली आहे. जोपर्यंत महाराष्ट्रावरील राजकीय संकट संपत नाही आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा रसाळ यांनी केल्याचे समजते.
रसाळ यांनी अनेक कार्यकर्त्यासह हा प्रण घेतल्यानंतर मंदिरामध्ये एकच जयघोष सुरु झाला. कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे तुम आगे बढो अशा जोरदार घोषणा दिल्या. आशा रसाळ यांनी घेतलेल्या या प्रतिज्ञेची सध्या राज्यभर चर्चा आहे.