इस्लामाबाद: जोपर्यंत काश्मीरमध्ये संचारबंदी कायम असेल तोपर्यंत भारतासोबत कोणतीही चर्चा केली जाणार नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी म्हटले आहे. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद 370 हटवल्यानंतर रोज नवी वक्तव्य करणाऱ्या इम्रान खान यांचे आणखी एक वक्तव्य आता समोर आले आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे.
पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी काश्मीरच्या अनुच्छेद 370 बाबत विचारले असता, जोपर्यंत येथील लोक त्यांच्या घरात कैदेत आहेत. तोपर्यंत या प्रश्नावर भारताशी चर्चा शक्यच नाही असे उत्तर इम्रान खान यांनी दिले आहे. दरम्यान पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे आणि लवकरच त्यावर ताबा मिळवू असे वक्तव्य मंगळवारीच केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले. यानंतर दुसऱ्याच दिवशी इम्रान खान यांचे आडमुठे वक्तव्य समोर आले आहे.