जयपूर – गेल्या काही दिवसांपासून राजस्थानातील राजकारणामध्ये वादळी घडामोडी घडत आहेत. राज्यातील सत्ताधारी काँग्रेसचे नंबर दोनचे नेते असलेल्या सचिन पायलट यांनी केलेल्या बंडामुळे राज्यसरकार टिकणार की पडणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच आज पायलट यांना पक्षातर्फे उपमुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आले असून त्यांनी भाजपसोबत कट रचत राज्य सरकार पडण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला आहे.
एकीकडे पायलट यांच्या बंडामुळे राज्यात वादळी राजकीय घडामोडी घडत असल्या तरी भाजपतर्फे मात्र अद्याप झाकली मूठ उघडण्यात आलेली नाहीये. भाजपतर्फे राज्य सरकार पडण्याचा प्रयत्न करण्यात येतोय या काँग्रेसच्या आरोपाला भाजपने धुडकावून लावले असून राज्यातील राजकीय पेचप्रसंग हा अंतर्गत गटबाजीचा परिणाम असल्याचं भाजपनं म्हंटल आहे.
याबाबत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी, “हे सरकार भ्रष्ट आहे. सध्या आम्ही कुठलीही मागणी करणार नाही. करोना व्हायरसची स्थिती सुद्धा या सरकारला हाताळता आलेली नाही. हे कमकुवत सरकार आहे. लोकांच्या हिताच्या दृष्टीने हे सरकार गेले पाहिजे” असे मत मांडले.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप राज्य सरकारपुढे बहुमत सिद्ध करण्याची मागणी करेल अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची सरकारकडे बहुमताचा आकडा नाही याची खात्री झाल्यानंतरच हे पाऊल उचलावं अशी धारणा असल्याचं वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिलंय.
असं आहे आकड्यांचं गणित राजस्थान विधानसभेमध्ये एकूण २०० सदस्य आहेत. पैकी १०१ सदस्यांचा पाठिंबा असल्यास सरकार बहुमत सिद्ध करू शकेल. मुख्यमंत्री गेहलोत यांनी यापूर्वी आपल्याकडे १०९ सदस्यांचा पाठिंबा असल्याचं म्हंटल होत. भाजपकडे ७२ आमदार असून त्यांना आरएलपीच्या तीन आमदारांचा पाठिंबा आहे.