नवी दिल्ली : सत्तास्थापनेचा दावा शनिवारपर्यंत करण्यात आता कुठलीही अडचण दिसत नाही. ज्या वेगाने आम्ही पुढे निघालो आहोत. आता आमच्या गाडीला ब्रेक नाहीत. ब्रेक काढलेत. गाडी वेगाने पुढे चालली आहे, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
संजय राऊत म्हणाले, सर्व महाराष्ट्राची इच्छा आहे, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असावेत. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ही महाआघाडी आहे इतकं मला माहीत आहे. बाकी सर्व आपआपल्या पद्धतीने तिचं नामकरण करत आहेत. छत्रपतींच्या नावाने महाराष्ट्रातील प्रत्येक मोठी गोष्ट घडत असते एवढं मी सांगतो. छत्रपती शिवरायांचे राज्य हे जगातलं सर्वात पहिले सेक्युलर राज्य होते, असेही ते म्हणाले.
दरम्यान सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत म्हणाले, राष्ट्रवादीला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याविषयी आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. ही चर्चा योग्य नसून त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.