भाजप शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांचा दावा
अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी असल्याने तोपर्यंत सर्व बंडोबा थंडोबा होतील, अशी प्रतिक्रिया भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी दिली. श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोथरूडमधून निवडणूक लढवत आहेत. म्हणून तेथेच किंवा पुण्यात बंडखोरी आहे, असे नव्हे तर बंडाचे निशाण संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच पक्षात आहे. सोमवारपर्यंत हे बंडोबा थंडोबा होतात, असे मिसाळ म्हणाल्या. त्यांचे नेतृत्त्वच त्यांचे बंड शांत करतील, असेही मिसाळ यांनी नमूद केले.
दरम्यान, शहरातील सर्वच मतदार संघामध्ये पक्षातील इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. पक्षाकडून एबी फॉर्म मिळणार नसल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने तोपर्यंत सर्वच पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे बंडखोरांबाबतचे खरे चित्र सोमवारी स्पष्ट होणार आहे.