मुंबई – सरकार अस्थिर करण्याचे तुमच्याच मनाचे खेळ आहेत, अशा परिस्थितीत कोणीही सरकार अस्थिर करत नाही. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वीही स्पष्ट केलं आहे. पण केवळ तुमचे अपयश झाकण्यासाठी अस्थिर-अस्थिर अशी ओरड केली जात आहे, असा टोला भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लगाविला.
प्रविण दरेकर म्हणाले, राज्यातील सत्ता टिकविणे हे तुमच्यासाठी संकट झाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार एकत्र काम करत आहे, मग पृथ्वीराज चव्हाण यांना हे सरकार आपले का वाटत नाही का?, असा सवाल त्यांनी केला. तसेच महाविकास आघाडीच्या एकत्रित पत्रकार परिषदेवरही त्यांनी टीका केली.
आम्ही निर्णय घेणारे नाही, असे राहुल गांधी का म्हणत आहेत? असा सवाल दरेकर यांनी केला. तुम्ही जर एकत्रित आहात तर विजय वडेट्टीवार यांनी 10 हजार एसटी मोफत सोडण्याची घोषणा केली होती, त्याचे काय झाले? उद्योग विषयक केंद्राच्या योजनांचा फायदा घेऊन धोरणे आखायला हवीत आणि महाराष्ट्राचे स्थान अबाधित ठेवायला हवे. पण उद्योगधंदे सुरळीत करण्याचे नियोजन या सरकारमध्ये नाही. 50 हजार उद्योग सुरु करण्याची घोषणा केली पण प्रत्यक्षात उद्योग सुरु झाले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रुग्णांना रुग्णालयात बेड का मिळत नाहीत? व्होटिंलेटर्स कुठे आहेत? सध्या हे सांगण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे केवळ काळजी करण्यापेक्षा उपायायोजना करण्याची आवश्यकता आहे. सरकारने चांगले काम करावे, मग नक्कीच नाव होईल. पण इतके मृत्यू होऊन सरकारची बदनामी नाही तर काय होणार. आमच्याकडे दुर्लक्ष केले तरी चालेल. पण रुग्णांकडे लक्ष द्या, त्यांना सोयी सुविधा द्या, असेही त्यांनी नमूद केले.