इस्लामपूर – महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाबाबत आपण समाधानी नाही. सातबारा कोरा करणे गरजेचे आहे. नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांना कर्जमाफी अन्यायकारक आहे. ऊस उत्पादक शेतकरी हा जुनअखेर कर्जाची परतफेड रितसर करीत असतो, त्या शेतकऱ्यांचा काय दोष? असे मत स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. या सरकारने शेतकऱ्यांसहीत महिलांना कर्जमाफीसाठी कोठेही रांगेत उभे केलेले नाही याचे समाधान वाटते असेही ते म्हणाले.
शिरटे (ता. वाळवा) येथे राष्ट्रीय शेतकरी दिवसाचे औचित्त्य साधून प्रकाश देसाई यांच्या सितामाई ऍग्रो प्रोड्युसर कंपनीस सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते एल. आर.पाटील होते. स्वाभिमानीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश देसाई, तालुकाध्यक्ष भागवत जाधव, विश्वास देसाई, जयवंत पाटील, पै. बाळासाहेब देसाई, भास्कर खोत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
माजी खा. शेट्टी म्हणाले, प्रामाणिक कर्जदार शेतकरी यांच्यावर जर अन्याय होत असेल. तर यापुढे तो कर्जाची परतफेड करणार नाही. याचा परिणाम संस्थावरती होऊन त्या डबघाईस येतील. सहकाराला पर्याय अशी सहकारी तत्वानेच चालणाऱ्या शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संस्था वाढल्या पाहिजेत. यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. जिल्हा नियोजनच्या नाविन्यपूर्ण योजनेतून सितामाई संस्थेचा विजेचा प्रश्न सोडवू. विश्वास देसाई म्हणाले, ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदे वाढवावेत म्हणून सरकार प्रयत्नशील असते. पंरतु याठिकाणी शेतकऱ्यांनी उभारलेल्या संस्थेस वीजजोडणी दोन वर्षे झाली बंद आहे.
वीजजोडणीचा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जयवंत पाटील व अशोक काकडे यांनी केली. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले. यावेळी पोपट नलवडे, अशोक काकडे, चंद्रकांत पाटील, बाळासाहेब पाटील, तानाजी पाटील, पोपट देसाई, गोपीचंद पाटील, रोहन पाटील, प्रताप पाटील, संजय देसाई, मोहन गावडे, आनंदा गावडे, रामचंद्र देसाई, अनिल पाटील, पवन काकडे उपस्थित होते.