मुंबई – राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाल्याच्या अटकळींनी जोर धरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे सूचित करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.
त्यानंतर वळसे-पाटील यांनी ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क सुरू झाले. अशात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राजकीय सस्पेन्स आणखी वाढवणारा दावा केला.
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री, गृहमंत्री या पदांच्या अदलाबदलीची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे सत्तारूढ आघाडीत घडणाऱ्या घडामोडी अस्वस्थतेपोटी आहेत की राज्य सरकारमधील फेरबदलांचे संकेत आहेत, असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.