पिंपरी – ऑनलाइन नोंदणी न झालेले शिधापत्रिका धारक सध्या नियमित धान्य वितरणापासून वंचित राहत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे त्यांची सध्या धान्य मिळविण्यासाठी वणवण सुरू आहे.
शिधापत्रिकेवर अंत्योदय अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना कार्डधारकांना एप्रिल महिन्यासाठी नियमित धान्य वाटपाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या दोन्ही योजनांमधील ज्या लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली आहे, त्यांनाच धान्य दिले जात आहे. ज्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली नाही, कार्डाची मुदत संपलेली आहे त्यांना धान्य मिळत नसल्याने त्यांना माघारी परतावे लागत आहे. पर्यायाने त्यांच्यातून नाराजीचा सूर उमटत आहे.
मोफत धान्यासाठी विचारणा
शासनाने प्रति व्यक्ती जाहीर केलेले पाच किलो मोफत धान्य सर्वांनाच मिळणार आहे, असा समज सर्वसामान्य नागरिकांचा झाला आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच आहे. शासनाने मोफत धान्य देण्याची योजना घोषित केली असली तरी त्याचा लाभ अंत्योदय अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील कार्डधारकांसाठीच लागू आहे. तसेच, या योजनेचा फायदा संबंधितांनी नियमित धान्य घेतल्यानंतरच दिला जाणार आहे. त्याविषयी योग्य माहिती नसल्याने नागरिकांकडून स्वस्त धान्य दुकानदारांकडे याबाबत सातत्याने विचारणा केली जात आहे.
ज्या शिधापत्रिकाधारकांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे, त्यांनाच सध्या धान्य दिले जात आहे. शासनाच्या निर्देशानुसार अंत्योदय अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना कार्डधारकांना नियमित धान्य घेतल्यानंतर मोफत धान्य दिले जाईल. मात्र, वाटप करावयाचे मोफत धान्य अद्याप उपलब्ध झालेले नाही.
– विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र शॉपकीपर फेडरेशन
स्वस्त धान्य दुकानांमध्ये सध्या 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ वितरित केले जात आहे. याबाबत निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा दराने गहू किंवा तांदूळ विकले जात असल्याची कोणतीही तक्रार आम्हाला अद्याप प्राप्त झालेली नाही.
– दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी, निगडी