मुजफ्फरनगर – केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात उत्तर प्रदेशात उद्या रविवारी मुजफ्फरनगर येथे किसान महापंचायत होणार आहे. या महापंचायतीसाठी तेथे प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
पीएसी या निमलष्करी दलाच्या सहा कंपन्या, रॅपिड ऍक्शन फोर्सच्या दोन कंपन्या, तसेच अन्यही मोठा फौज फाटा तेथे तैनात करण्यात येणार आहे. तसेच पाच पोलीस अधीक्षक, सात सहायक अधीक्षक आणि चाळीस पोलीस निरीक्षक तेथे नेमले जाणार आहेत.
उत्तर प्रदेशबरोबरच हरियाणा, पंजाब आणि महाराष्ट्रातील शेतकरीही यात सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांच्या अनेक संघटना यात सहभागी होणार आहेत. उसाच्या आधारभूत किमतीत वाढ करावी, शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा सुरू करावा आदी मुद्देही यावेळी चर्चेला घेतले जाणार आहेत. उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या विरोधात यानिमित्ताने वातावरण तापवण्याचाही शेतकरी संघटनांचा इरादा आहे.