नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचार हे आता एक समीकरण बनत चालले आहे. राज्यात रोज महिला अत्याचारावरील घटना समोर येत आहेत. त्यातच आता उन्नावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शेतात दोन मुलींचे मृतदेह आढळले असून तिसऱ्या मुलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. तीन अल्पवयीन मुली शेतात ओढणीला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
असोहा पोलीस स्टेशन परिसरातील बबुरहा या गावात ही भयंकर घटना घडली आहे. या घटनेवरून राजकारण तापलं असून अनेकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच राज्यातील महिला सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
अत्यंत भयावह आदित्यनाथ जी का राज बेटियों के लिये क़ब्रगाह बन गया है, उन्नाव की घटना दिल दहला देने वाली है आख़िर कब रुकेगी ये दरिंदगी? https://t.co/pl6plhSASG
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) February 17, 2021
पोलीस अधिकाऱ्यांनी असोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मुली शेतात संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या आहेत. सध्या या प्रकरणात अनेकांची अधिक चौकशी केली जात असून वेगाने तपास करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. मात्र सपाचे नेते सुनील सिंग यादव यांनी या प्रकरणात मुलींवर अत्याचार झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्याबाबत एक ट्विट देखील केले आहे. यासोबतच आपचे नेते संजय सिंह यांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला असून टीकास्त्र सोडलं आहे. “अत्यंत भयावह… आदित्यनाथजींचं राज्य मुलींसाठी स्मशानभूमी बनलं” असं म्हणत जोरदार टीका केली आहे.