पुणे – ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि महत्वाचे नाका-तोंडाला मास्क बंधनकारक, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.
मात्र, काही महाभाग त्याकडे दुर्लक्ष करत असून, अशा बेजाबदारपणे विनामास्क फिरणाऱ्यांवर ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 40 हजार 255 विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करून 1 कोटी 13 लाख 20 हजार 890 रूपयांचा दंड वसूल केला आहे.
सोशल डिस्टन्शिंग, सॅनिटायझ आणि मास्क या त्रिसुत्रीचा अवलंब केला तर करोना संसर्ग लवकर आटोक्यात येऊ शकतो. त्यासाठी प्रशासनाकडून वारंवार गावपातळीवर जनजागृती केली जात आहे. परंतू, “हा करोना आपल्याला काय करू शकत नाही’ अशा अविर्भावात काही नागरिक विनामास्क बाहेर फिरतात. मात्र, त्यामुळे स्वत:बरोबरच दुसऱ्याचा जीव धोक्यात आणत आहे. कारण, संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणे चार ते पाच दिवसांनी दिसतात. तोपर्यंत हा संसर्ग अनेक लोकांपर्यंत पोहचण्याची भिती अधिक असते.
ग्रीमीण भागात बेशिस्तपणे विनामास्क फिरणाऱ्यांमध्ये सर्वाधिक कारवाई संख्या इंदापूर तालुक्यात आहे. 8 हजार 602 विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ हवेली तालुक्यात 7 हजार 888, जुन्नर तालुक्यात 4 हजार 772, मावळ तालुक्यात 3 हजार 45, पुरंदरमध्ये 3 हजार 258, मुळशी तालुक्यात 2 हजार 426 तर बारामतीमध्ये 1 हजार 720 जणांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.