मुंबई – राज्यात करोना विषाणूने हाहाकार माजवला होता. मात्र सध्या नवीन करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत आहे. तसेच रिकव्हरी रेटही वाढत आहे. त्यामुळे आता राज्यात अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनलाॅकबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केलीय. राज्यात 5 टप्प्यांमध्ये अनलाॅक होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
“सध्याच्या परिस्थितीत पाच टप्प्यांमध्ये अनलॉक केलं जाणार आहे. या पाच टप्प्यांमध्ये ज्या जिल्ह्यात पाच टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल. यामध्ये रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकानं किंवा ट्रेन देखील सुरू होतील. जिल्हे आणि महानगर पालिकांचे धरून एकूण 43 भाग पाडले आहेत. या सर्व नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
“पूर्ण अनलॉक लागू होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, सायकलिंक ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, खासगी कार्यालये, सरकारी कार्यालयांना 100 टक्के मुभा, क्रीडांगणे आणि थिएटर्सला परवानगी असेल. शूटिंगला देखील परवानगी असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असेल. लग्नसोहळ्यांना देखील 100 टक्के उपस्थितीची परवानगी असेल”, असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.